मुंबई : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘लोकसत्ता लेक्चर’ नव्या उपक्रमाची सुरुवात होत आहे. पहिल्या वर्षी शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी मुंबईत ‘संघराज्याच्या क्षमतांचे आकलन’ (अंडरस्टॅण्डिंग फेडरलिझम अॅण्ड इट्स पोटेन्शियल) या विषयावर व्याख्यान होईल. यानिमित्ताने सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई: विमानतळावर दोन तस्करांकडून सात कोटींचे सोने जप्त

सर्वोच्च न्यायालयाला ‘संविधानाचे राखणदार’ म्हटले जाते, कारण संविधानाचा अर्थ लावणे आणि प्रसंगी बेबंद राजकारणापासून देशाला वाचवण्यासाठी संविधानाचा आसूडही (रिट) उगारणे हे सर्वोच्च न्यायालयाचे कर्तव्य. राज्यपालांना त्यांच्या अधिकारांप्रमाणेच मर्यादांचीही जाणीव देऊन, केंद्राने राज्यांवर लादलेले निर्णय रद्द करून तसेच कोणते कर आकारण्याचा अधिकार राज्यांनाच आहे हे वेळोवेळी सकारण स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने संविधानाला अपेक्षित असलेल्या केंद्र-राज्य संबंधातील समतोलाचेही रक्षण केलेले आहे.

यापैकी काही निकाल उण्यापुऱ्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनीही दिलेले आहेत. त्यामुळेच, संविधानाचा अमृतमहोत्सवी क्षण महिन्याभरावर (२६ नोव्हेंबर) आला असताना हे वक्ते आणि हा विषय यांनी ‘लोकसत्ता व्याख्यान’ उपक्रमाचे पहिले पाऊल रोवले जाणे निव्वळ दमदार नव्हे तर औचित्यपूर्णही ठरणार आहे.