D. Y. Chandrachud in Loksatta Lecture Program : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘लोकसत्ता लेक्चर’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे या व्याख्यान परंपरेचे पहिले मानकरी ठरले आहेत. ‘संघराज्याच्या क्षमतांचे आकलन’ (अंडरस्टॅण्डिंग फेडरलिझम अॅण्ड इट्स पोटेन्शियल) या विषयावर त्यांनी आपले विचार मांडल्यानंतर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या बालपणीचे अनेक किस्से सांगितले आहेत.

सरन्यायाधीशांचा मुलगा म्हणून तुमचं बालपण कसं गेलं? तुम्हालाही शाळेत छडीचा मार मिळाला आहे का? असे अनेकविध प्रश्न विचारण्यात आले. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिलखुलास उत्तरे दिली. ते म्हणाले, शाळेत असताना मीही मार खाल्ला आहे. यामुळे सात-आठ दिवस माझा हात दुखत होता. आई-वडिलांना घाबरून सात आठ दिवस त्यांच्यापासून हात लपवून मी घरात वावरलो. “

धनाला नाही, ज्ञानाला महत्त्व दे

ते पुढे म्हणाले, “आई-वडिलांचा आमच्यावर काहीच दबाव नव्हता. त्यांची एकच अपेक्षा होती की ज्ञानाची उपासना करा. आई म्हणाली होती की तुझं नाव धनजंय ठेवलंय. पण हे पैशांचं धन नाही, ज्ञानाला महत्त्व दे. त्यांनी कधीच दबाव आणला नाही. त्यांनी स्वतःच्या जीवनाचं आदर्श आमच्यासमोर ठेवलं.

…पण तबला वडिलांनी लपवला

“मी तबला आणि पेटी वाजवायचो”, अशी आठवणही त्यांनी सांगितली. ते म्हणाले, मी गाणंही शिकलो होतो. अनेक रागही शिकलो होतो. पण एकदा तबला अचानक गायब झाला. तबला मी सगळीकडे शोधला. पण तो कोणीतरी लपवून ठेवला होता. नंतर बहिणीने मला सांगितलं की वडिलांना वाटलं की मी तबला वाजवण्याच्या मार्गावर आहे. पण त्यांना असं वाटलं नाही की झाकिर हुसेन होईन”, अशी खुमासदार टीप्पणीही त्यांनी केली. “आजकालच्या आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलाने ९९ टक्के मिळवले पाहिजे. वाद्य वाजवले पाहिजेत, स्वीमिंग शिकलं पाहिजे. परंतु, माझ्या आई वडिलांना असं काही वाटलं नव्हतं”, असंही ते म्हणाले.

पु. ल. देशपांडे अन् किशोरीताई आमोणकरांचा सहवास

“पु. ल. देशपांडे हे माझ्या वडिलांचे कॉलेजपासूनचे मित्र. माझ्या वडिलांना त्यांचा खूपवर्षे सहवास लाभला. पु. ल. आमच्या घरी यायचे, माझे वडील त्यांच्या घरी जायचे. माझी आई गानसरस्वती किशोरी आमोणकर यांची शिष्या होती. त्यामुळे आम्हाला साहित्य, गाणं याचा सहवास होता. किशोरीताई दर आठवड्याला एकदा तरी आमच्या घरी रियाज करायला यायच्या. सायंकाळी आल्या तर यमन गायच्या. लहानपणी मी आणि माझी बहीण पडद्याआड उभं राहून त्यांची गाणी ऐकत असू. माझ्या वडिलांना ते बंधूराज म्हणत”, अशी सुरेल आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

“मी तेव्हा कविता लिहायचो. पु. ल. देशपांडे यांच्या समोरही मी कविता वाचली होती. ते म्हणाले होते की देशभर प्रवास केला पाहिजे. तू देशभर प्रवास करशील तेव्हा तुला देशाची विविधता लक्षात येईल. तेव्हाच तू सार्वजनिक पदासाठी पात्र होशील. ते मला अजूनही आठवतं. पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर माझ्या वडिलांच्या रात्री दोन- अडीचपर्यंत गप्पा व्हायच्या. मध्येच एखादं गाणं व्हायचं. वाऱ्यावरची वरातमधील संवाद व्हायचे. माझे वडील त्यांच्या व्यवसायातील गोष्टी सांगायचे. अशा थोर मंडळींच्या सानिध्यात माझं बालपण गेलं”, असं धनंजय चंद्रचूड म्हणाले.