मुंबई : मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक जाळ्या बसवून ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे, यास आमचे प्राधान्य आहे. तर दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुंबई मुक्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली.

हेही वाचा >>> गोंधळाची चाहूल; विद्यामान विधानसभेचे अखेरचे अधिवेशन आजपासून

मुंबईत निसरड्या डोंगर उतारावर वसलेल्या झोपड्यांमधून अनेक कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या झोपड्यांवर दरड कोसळण्याचा धोका असतो. मुंबईत अशी सुमारे २०० ठिकाणे आहेत. यापैकी काही ठिकाणे अतिधोकादायक आहेत. दरड कोसळण्याची शक्यता असलेली सर्वाधिक ठिकाणे पूर्व उपनगरात आहेत. त्यापैकी घाटकोपर येथील आझाद नगर परिसरातील अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या व संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संरक्षक जाळी बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची पाहणी मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी केली. मुंबईत दरडप्रवण क्षेत्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. संभाव्य ३१ ठिकाणी दरडप्रवण क्षेत्राची स्थिती पाहता अत्याधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत दरडप्रवण क्षेत्रात ३१ ठिकाणी सर्वेक्षणाचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज कामाची पाहणी केली.

धोकादायक इमारतींबाबत धोरण

मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात सुरक्षा जाळ्या बसवून ही क्षेत्रे अधिक संरक्षित करण्यास आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेण्यास प्राधान्य आहे. दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुंबई मुक्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्याचबरोबर म्हाडा, महापालिका, एमआयडीसी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार असल्याचे अश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी घाटकोपर येथे दिले.