मुंबई: मुंबई महानगरातील प्रदूषण नियंत्रणासाठी दिल्लीच्या धर्तीवर शहरात एअर प्युरिफायर टॉवर बसवा, तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अंतर्भाव महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त आय.एस. चहल यांना दिले आहेत.
शहरातील दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणाने मुंबईकर हैराण आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी करून लोकांना दिलासा देण्यासाठी दिल्ली, गुडगाव, लखनऊप्रमाणे मुंबईतही ठिकठिकाणी एअर प्युरिफायर टॉवर बसवावेत. त्याचबरोबर शहरी वनीकरण वाढेल यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
‘ सुलभ सेवेसाठी प्रयत्न करा’
महापालिकेच्या शाळेत इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करावेत, पालिकेकडून इमारत परवाना, मालमत्ता कर, दुकान नोंदणी परवान्याचे नूतनीकरण या परवानग्या आणि परवाने ऑनलाईन देत आहेत त्याच बरोबर नागरिकांना सर्व सुविधा सहज मिळतील अशा पद्धतीने सुशासन असावे, यावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.