समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करत असताना महाराष्ट्र आणि कर्नाटकचा रस्ता कर्नाटक जर महाराष्ट्रासाठी बंद करत असेल, यावर आधी बोला आणि मग शिवसेनाप्रमुखांचं नाव असलेल्या महामार्गाचं उद्घाटन करा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह पंतप्रधान मोदी यांच्या केली होती. दरम्यान, ठाकरेंच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा – “तीन वर्षे स्थगितीतच वाया गेले”, फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “अरे कुणाच्या बापाच्या…”

काय म्हणाले मुख्यमंंत्री?

“सीमाप्रश्न लवकरच सुटेल. सीमावादावरून झालेल्या आंदोलनात आम्ही सहभाग घेतला होता. सीमा भागातील नागरिकांसाठी ज्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या होत्या. त्या आम्ही पुन्हा सुरू केलेल्या आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशीदेखील याविषयावर बोलणं झालं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी मी स्वत: बोललो आहे. सीमा भागातील कोणताही त्रास होता कामा नये, हे देखील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना त्याची जाणीव आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा – चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “वाह रे पठ्ठ्या…”

महाराष्ट्राचे मंत्री अमित शाहांना कितीहीदा भेटले, तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले होते. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. “हा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही भाष्य करणं योग्य नाही. आम्ही हा मुद्दा संयमाने घेतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कोणालाही त्रास होऊ नये, याची जबाबदारी त्यांची आहे”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “हेलिकॉप्टर १० फुटांपर्यंत खाली-वर जात होतं, अन् मी…”; मुख्यमंत्र्यांनी सांगितला थरारक अनुभव

दरम्यान, समृद्धी महामार्गाचे उद्या लोकार्पण होणार आहे. याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. लाखो लोकांना दिलासा आणि वरदान ठरणारा हा महामार्ग आहे. या गोष्टीचा आज आनंद वाटतो आहे. तसेच समाधानही आहे. या प्रकल्पाची सुरूवात देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून झाली होती. त्यावेळी मी या खात्याचा मंत्री होतो आणि आज मुख्यमंत्री म्हणून लोकार्पण आज बघायला मिळते आहे. हा केवळ योगायोग आहे आणि या महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्याचा भाग्य मिळालं याचाही आनंद आहे”, असे ते म्हणाले.