शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाने पक्षावर दावा करत असतानाच दसरा मेळाव्यासारख्या परंपरांवरही दावा-प्रतिदावा केला. यानंतर आता दोन दसरा मेळावे होत आहेत. मात्र, यंदा शिंदे गटाने मुंबई महानगरपालिकेला अर्ज करत शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये वातावरण तणावाचं झाला. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचा दुसरा दसरा मेळावा कुठे होणार आहे, असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला. त्यावर शिंदेंनी भूमिका स्पष्ट करत दसरा मेळाव्याचं ठिकाण सांगितलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, “आमच्या दसरा मेळाव्याच्या सभेसाठी आझाद मैदान आणि क्रॉस मैदान आरक्षित केलं आहे. त्यामुळे यावेळचा दसरा मेळावा तेथेच होईल. यावेळी बीकेसी मैदानात काम सुरू आहे. त्यामुळे इतर मैदानं दसरा मेळाव्यासाठी आरक्षित केली आहेत. तेथेच दसरा मेळावा होईल.”
“…तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही”
एक्स या समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही.”
“बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती”, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
“बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहेत की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटावर केली आहे.
हेही वाचा >> शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने अर्ज मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांना अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.