“२००२ सालची गोध्रा दुर्घटना ते २०१९ चा पुलवामा हल्ला या दरम्यान प्रत्येक लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात मोठी दुर्घटना घडलेली आहे. हा निव्वळ योगायोग् नाही. म्हणून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पॅलेस्टीनच्या ‘हमास’ या दहशतवादी संघटनेच्या निमित्ताने नरेंद्र मोदी पाकिस्तानशी कुरापत काढू शकतात,” असा खळबळजनक दावा काँग्रेस खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केला. ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान’च्या २०२३ च्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भाषातज्ज्ञ गणेश देवी आणि काँग्रेसचे गुजरातमधील आमदार व दलित कार्यकर्ते जिग्नेश मेवाणी यांना ‘दया पवार पुरस्कार’ तर ‘निळ्या -काळ्या रेषा’ आत्मकथनाचे लेखक राजू बाविस्कर यांना ‘ग्रंथाली’च्या ‘बलुतं’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना कुमार केतकर म्हणाले, “साम्यवाद आणि गांधीवाद यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न कवी नामदेव ढसाळ यांनी केले. त्याचे प्रॉडक्ट म्हणजे दया पवार होते. दलित चळवळ जोपर्यंत जीवन मरणाचे प्रश्न मांडत नाही, तोपर्यंत आंबेडकरी उत्सव निरर्थक आहेत. देशात जे काही चालले आहे, त्याने चळवळींनी अंत:र्मुख व्हायला हवे. अंत:र्मुख झालो, तरच बंड होते.”

“सत्ता तुमची पण देश त्यांच्या ताब्यात अशी स्थिती असेल”

“२०२४ च्या निवडणुकांत जरी सत्ता परिर्वतन झाले, तरी घटनात्मक संस्थांमध्ये माणसे संघ परिवाराची असणार आहेत. सत्ता तुमची पण देश त्यांच्या ताब्यात अशी स्थिती असेल. त्यामुळे आपल्याला संघर्षाला तयार राहायले पाहिजे,” असा सल्ला कुमार केतकर यांनी दिला.

“महाराष्ट्रातल्या दलित चळवळीचं भूमिहीन आंदोलनाकडे दुर्लक्ष”

महाराष्ट्रातल्या दलित चळवळीने भूमिहीन आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याची खंत आमदार जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केली. दलित चळवळीने अल्पसंख्य, भटके- विमुक्त, आदिवासी यांना बरोबर घेतले पाहिजे, असे मत मेवाणी यांनी व्यक्त केले. शिक्षण, आरोग्य, रोहयोचे दर यावर दलित चळवळ जोपर्यंत मोर्चे काढत नाही, तोपर्यंत ‘नमो बुद्धाय’ व ‘जयभीम’ या आपल्या घोषणांना अर्थच नाही, असे मेवाणी यांनी सुनावले.

“प्रस्थापित सत्ता संविधान बदलण्याची भाषा करत असेल, तर निश्चितच…”

दादासाहेब गायकवाड यांचे स्मरण करत जिग्नेश मेवाणी म्हणाले, “भूमिहीन दलित शोषितांसाठी आंदोलन उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी नेतृत्व महाराष्ट्र व गुजरातने करावे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत क्रांती करण्यासाठी लोकांनी सज्ज व्हायला हवे. जर प्रस्थापित सत्ता संविधान बदलण्याची भाषा करत असेल, तर निश्चितच या सत्तेला बाजूला करणे गरजेचे आहे. जनतेने आगामी निवडणुकींमध्ये बदल घडवावा.”

“‘बलुतं’ अस्मितेचे व आंदोलनाचे भक्कम असे निशाण”

भारतीय साहित्यात नवी उर्जा निर्माणाचे काम दलित चळवळीने केले.“’बलुतं’ हे अस्मितेचे व आंदोलनाचे भक्कम असे निशाण आहे, असे गणेश देवी म्हणाले. सत्य नसते तिथे कृती फार काळ टिकत नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा अंदाज येईल, असे भाष्य त्यांनी केले.

“बलुतेदारांचे राज्य जगभर निर्माण झाले पाहिजे”

पुरस्कार वितरण सोहळ्यातील पुरस्कार्थी डॉ. गणेश देवी म्हणाले, “बलुतंने भारतीय साहित्यात ऊर्जा निर्माण करण्याचे काम केले. ज्ञान निर्मिती आणि सामाजिक कृती ही गाडीची सोबत चालणारी चाके आहेत. ज्या कामासाठी मला हा पुरस्कार देण्यात आला ते भाषांचे काम आजही सुरू आहे. माणूस भाषा विसरत चाललेला प्राणी आहे. अनेकांचे आवाज आपल्यापर्यंत येतच नाहीत. या वेदनेमुळे मी काम सुरू केले होते. मात्र ते अजूनही पूर्ण झाले नाही. बलुतेदारांचे राज्य जगभर निर्माण झाले पाहिजे आणि त्यासाठी त्यांच्याविरोधात प्रसवले जाणारे विष कमी करणे गरजेचे आहे.”

गणेश देवी यांनी त्यांच्या भाषणात हे देखील सांगितले की, भटक्या विमुक्तांसाठी महाश्वेता देवी, लक्ष्मण गायकवाड व स्वतः गणेश देवी यांनी भारतभर दौरे काढून जनजागृतीचे काम केले. चित्रकार आणि आता साहित्य विश्वात पाऊल टाकलेल्या राजू बाविस्कर यांनीही पुरस्कारासाठी त्यांच्या नावाचा विचार केला यासाठी पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानचे आभार मानले.

“मराठी साहित्य विश्वातील मी वाचलेले पहिले पुस्तक म्हणजे बलुतं”

राजू बाविस्कर म्हणाले, “मराठी साहित्य विश्वातील मी वाचलेले पहिले पुस्तक म्हणजे बलुतं. जगभरात पाश्चात्य चित्रकारांची आत्मकथने उपलब्ध आहेत. ठराविक चित्र काढताना त्या चित्रकाराच्या मनातील भाव, विचार तसेच त्या चित्रामागची प्रेरणा अशी सगळी निर्मिती प्रक्रिया उलगडते. मराठीतही मी हा प्रयत्न केला आहे.”

हेही वाचा : भारताच्या आठ माजी नौसैनिकांना कतारने फाशीची शिक्षा का सुनावली? त्यांच्यावर कोणते आरोप ठेवण्यात आले?

विपिन तातड आणि मधुरा घाणे या युवांनी रॅप गीत तर नेहा कुलकर्णी व अक्षय शिंपी यांनी ‘सदाचार की ताबीज’ याचे सादरीकरण केले. हिरा दया पवार यांनी दया पवार यांची ‘बाई मी धरणं… धरणं बांधते’ ही कविता गायली. चव्हाण सेंटरचे दत्ता बाळसराफ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दया पवार प्रतिष्ठानचे सचिव प्रशात पवार यांनी मानपत्राचे वाचन केले. पत्रकार अलका धुपकर यांनी सूत्रसंचालन केले. दया पवार प्रतिष्ठानच्या पुरस्काराचे यंदाचे २५ वे तर बलुतं पुरस्काराचे ४ थे वर्ष होते.

Story img Loader