मुंबई : कॉटन असोशिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) देशातील कापूस उत्पादनात वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. आपल्या या पूर्वीच्या अंदाजात वाढ करीत २०२४ – २५ च्या हंगामात देशभरात ऑक्टोबर २०२५ अखेर ३०४.२५ तर स लाख कापूस गाठींचे (एक गाठ – १७० किलो रुई) उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
देशातील सुमारे अकरा राज्यात कापूस उत्पादन होते. यंदा महाराष्ट्रातून सर्वांधिक ९० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज आहे. त्याखालोखाल गुजरातमधून ८० लाख गाठी, तेलंगाणातून ४२ लाख गाठी, कर्नाटकातून २३ लाख गाठी, मध्य प्रदेशातून १९ लाख गाठी आणि आंध्र प्रदेशातून ११ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज आहे. दरम्यान, डिसेंबरअखेर १७६.०४ लाख कापूस गाठींचा पुरवठा झाला आहे. तर १२ लाख गाठींची आयात झाली आहे.
हेही वाचा – मुंबई : दूरस्थ शिक्षणापासून विद्यार्थी दूर, यंदा १६ अभ्यासक्रमांसाठी अवघे २४ हजार ८९४ विद्यार्थी
सीएआयच्या अंदाजनुसार देशात गत हंगामातील ३०.१९ लाख गाठी कापूस शिल्लक होता. डिसेंबरअखेर कापड उद्योगाने एकूण ८४ लाख गाठींचा वापर केला आहे. तर सात लाख गाठींची निर्यात झाली आहे. कापूस उत्पादन, गतवर्षांचा साठा आणि संभाव्य आयातीचा विचार करून सीएआयने कापूस हंगाम २०२४-२५ मध्ये सप्टेंबर २०२५ अखेर एकूण ३५९.४४ लाख गाठींचा पुरवठा होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, खासगी बाजारात व्यापारी कापसाला प्रति क्विंटल ६५०० ते ७००० रुपये दर देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (सीसीआय) हमीभावाने ७५०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी वाढविण्याची मागणी होत आहे. त्यानुसार सीसीआयने खरेदी वाढवली आहे. सध्या बाजारात येणाऱ्या कापसापैकी ६० ते ६५ टक्के कापूस सीसीआय खरेदी करीत आहे.
© The Indian Express (P) Ltd