लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली असून उद्योग क्षेत्रासह राजकीय, सामाजिक आदी विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नरिमन पॉईंट येथील ‘एनसीपीए’मधील प्रांगणात ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी उद्योजक, टाटा उद्योग समूहाच्या विविध कंपन्यांमधील कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक, राजकीय, सामाजिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवर रतन टाटा यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी येत आहेत. यामुळे ‘एनसीपीए’ परिसरात गर्दी होऊ लागली असून अंत्यदर्शनासाठी मोठी रांग लागली आहे.

रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी ‘एनसीपीए’मधून दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान वरळीतील स्मशानभूमीत नेण्यात येणार आहे. यादृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे. तत्पूर्वी रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी ‘एनसीपीए’ येथे सकाळपासूनच गर्दी वाढत आहे. अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रांगेची विशेष व्यवस्था करण्यात आली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अंत्यदर्शनासाठी प्रवेशद्वारातून आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाची पोलीस तपासणी करीत असून सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व काळजी घेण्यात आली आहे.

आणखी वाचा-पोलीस व्यथा-भाग ३ : सेवानिवृत्तीनंतर वैद्यकीय सुविधांपासून वंचित

नरिमन पॉईंट या परिसरात विविध मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे या परिसरात नेहमीच सकाळपासून नागरिक व वाहनांची वर्दळ असते. सध्या नरिमन पॉईंट परिसरात काही प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रण करीत आहेत.