मुंबई : श्रमराज कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे राज्यातील विविध ठिकाणी नारायण सुर्वे यांच्या साहित्य संपदेवर आधारित विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करून कामगार साहित्याचा जागर केला जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवार, २७ मार्च रोजी केली. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘मराठी आठव दिवस’चा तृतीय वर्धापन दिन आणि सुर्वे साहित्य संमेलनाचे उद्घाटन शेलार यांच्या हस्ते झाले. तसेच पुढील वर्षीपासून ‘मराठी आठव दिवस’च्या नारायण सुर्वे वार्षिक साहित्य संमेलनात श्रम साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या एका साहित्यिकाला ५० हजार रुपयांचा पुरस्कार स्वतःतर्फे दिला जाईल, असेही शेलार म्हणाले.

ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुर्वे साहित्य संमेलनात ‘मराठी आठव दिवस’ उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या भाऊ कोरगावकर, डॉ. महेश केळुसकर, अशोक नायगावकर यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. तसेच प्रदीप आवटे, योगिता राजकर, मधुकर मातोंडकर, सुनील उबाळे, सुजाता राऊत, सफरअली इसफ या नवोदित साहित्यिकांना ‘जाहीरनामा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच दर महिन्याच्या २७ तारखेला ‘ मराठी आठव दिवस’ कार्यक्रम करण्यासाठी राज्यभरातून अनेक मराठी दानशूर व्यक्ती उत्स्फूर्तपणे पुढे येत असल्याबद्दल संस्थापक रजनीश राणे यांनी समाधान व्यक्त केले.