लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : सायबर फसवणूक झालेल्या व्यक्तीला दूरध्वनी किंवा व्हॉटस्अच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधता यावा यासाठी नवीन ‘डिजिटल रक्षक’ मदत क्रमांक सुरू करण्यात आला आहे. या मदत क्रमांकाद्वारे सायबर फसवणूक झालेल्या व्यक्तीचे समुपदेशन करून मदत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सायबर फसवणुकीपासून बचावाकरीता नागरिकांचा योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दिवसेंदिवस जागतिक व देश स्तरावर सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. दैनंदिन इंटरनेट व मोबाइलच्या वापरात होणारी वाढ लक्षात घेता सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणातही मोठ्या संख्येने वाढ होत आहे. तसेच सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील दैनंदिन कामकाजाच्या डिजिटलायझेशनमुळे जगभरात सायबर गुन्हयांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तांत्रिक प्रगती आणि नव्या सुविधा लक्षात घेऊन सायबर गुन्हेगार सतत त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करीत आहेत.
ऑनलाइन नोकरी, ऑनलाइन शेअर बाजारातील गुंतवणूक, फिशिंग, क्रेडिट कार्ड, सेक्सटोर्शन, कर्ज आणि विवाहविषयक फसवणूक यासारखे गुन्हे प्रचलित असताना, अलिकडच्या काळात डिजिटल अटक फसवणूक या गुन्हयांच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर फसवणूक करणारे नामांकीत कुरिअर कंपनीचे प्रतिनिधी बोलत असल्याचे भासवतात. आपल्या नावे आंतराष्ट्रीय कुरिअर केले असून त्यामध्ये अमली पदार्थ, हत्यारे, बनावट पारपत्र, अवैद्य सिम कार्ड, हवालाचे पैसे किंवा इतर अनधिकृत गोष्टी असल्याबाबत संपर्क साधून सायबर गुन्हे घडत आहेत.
त्यामध्ये ते पोलीस,प्राप्तीकर विभाग, आय.बी, सीबीआय, ईडी इत्यादी शासकीय विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून किंवा समाज माध्यमातून अधिकाऱ्यांचे बनावट ओळखपत्र व संबंधित नोटीस पाठवून नागरिकांना पैसे पाठविण्यास भाग पाडतात. अशा प्रकारच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई पोलिसांनी नागरिकांना मोबाइल क्रमांक ७७१५००४४४४, ७४०००८६६६६ उपलब्ध केले असून याद्वारे नागरिकांना दूरध्वनी अथवा व्हॉटस् ॲपच्या माध्यमातुन पोलीसांना संपर्क साधता येईल.
डिजिटल रक्षक मदत क्रमांक सुविधा २४ तास कार्यरत राहणार असून नागरिकांनी या क्रमांकांवर संपर्क साधल्यास फसवणुकीला बळी पडण्यापूर्वी संशयास्पद दूरध्वनी व पाठविलेल्या कोणत्याही सरकारी दस्तऐवजाची वैधता पडताळणी करू शकतात. तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करणे व पीडितांमधील घबराट आणि त्रास कमी करण्यासाठी तात्काळ सायबर पोलीसांचे अथवा स्थानिक पोलीस ठाण्यांचे पथक पाठवून डिजिटल अटक फसवणूक प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्तीचे समुपदेशन करून मदत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना सायबर फसवणुकीपासून बचावाकरीता योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे.