अनिश पाटील, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या सायबर मदतवाहिनीच्या (हेल्पलाइन) माध्यमातून आतापर्यंत फसवणूकीतील ५० कोटी रुपये वाचवण्यात यश आले आहे. सायबर पोलिसांच्या १९३० या मदत वाहिनीवर आतापर्यंत सुमारे सव्वा दोन लाख दूरध्वनी आले आहेत. त्यानंतर फसवणुकीची रक्कम गोठवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> साई रिसॉर्टच्या बांधकामाचे प्रकरण : सत्ताधाऱ्यांना केवळ विरोधकांवरच कारवाई करण्यात स्वारस्य

मुंबई शहरातील नागरिकांची सायबर गुन्हयामध्ये फसवणूक झालेली रक्कम संबधित बँक खात्यामध्ये गोठविण्याकरिता मुंबई गुन्हे शाखा अंतर्गत १९३० हेल्पलाइन १७ मे २०२२ मध्ये कार्यान्वित करण्यात आली होती. याद्वारे सायबर गुन्हयात हस्तांतरीत झालेली रक्कम तात्काळ गोठवण्याचे काम करण्यात येते. त्या अंतर्गत आतापर्यंत सुमारे ५० कोटी रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे. त्यात ईमेल फिशिंग, ऑनलाइन जॉब फ्रॉड, क्लासिफाईड फ्रॉड, केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक, वधू-वर सूचन संकेतस्थळावरून ओळख करून फसवणूक, समाज माध्यांवरून ओळख करून फसवणूक, ओटीपी फसवणूक, सेक्सटॉर्शनसारख्या कुठल्याही फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये फसवणूक करण्यात आलेली ही रक्कम आहे.

हेही वाचा >>> आचारसंहितेपूर्वी १,९०० कोटींची कर्जहमी; सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांसाठी घाईघाईने निर्णय

रस्ते अपघातातील जखमीला तात्काळ उपचार मिळून जीव वाचला तर त्या काळाला गोल्डन अवर्स म्हणतात. तसेच सायबर गुन्ह्यांमध्ये लवकर सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पैसे वाचवणे शक्य होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. पूर्वी सायबर गुन्ह्यांमध्ये बँकेची पडताळणी व अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल झाल्यानंतर आठवड्याचा कालावधी लागायचा. त्याचा फायदा घेत आरोपी खात्यातील रक्कम काढायचे. पोलिसांच्या हेल्पलाइनवर दूरध्वनी केल्यास तात्काळ रक्कम गोठवणे शक्य आहे. त्यासाठी १९३० या क्रमांकावर संपर्क साधणे आवश्यक आहे अथवा तात्काळ ऑनालाइन तक्रार करणे आवश्यक आहे. याशिवाय स्थानिक पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार केल्यास फसवणुकीचे पैसे वाचवणे शक्य होते. २४ तास सुरू असलेल्या या हेल्पलाइनसाठी दोन पोलीस उपनिरीक्षक व ४८ अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे.

आतापर्यंत सव्वादोन लाख दूरध्वनी

१७ मे २०२२ ला सुरू करण्यात आलेल्या सायबर पोलिसांच्या मदतवाहिनीवर आतापर्यंत दोन लाख १५ हजार दूरध्वनी आले आहेत. त्यातील ३३ हजार ७३८ प्रकरणांच्या नोंदी एनसीआरपी संकेतस्थळावरील असून त्यातील ५० कोटी १३ लाख ९४ हजार रुपये वाचवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. दररोज या मदत क्रमांकावर १५०० ते १८०० दूरध्वनी येतात. रात्रीच्यावेळीही २५० ते ३५० दूरध्वनी या मदत क्रमांकावर येत असतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber police helpline saves rs 50 crore of mumbaikars by fraudsters mumbai print news zws
Show comments