मुंबई : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोकदरबार भरविला जाईल. तसेच अन्य विभागांच्या तक्रारींचेही लोकदरबारात निवारण करण्यात येईल, अशी घोषणा पर्यटनमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात लोढा बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा पुरस्काराचेही वितरण यावेळी करण्यात आले. गुणवंत खेळाडू पुरस्कार अक्षय तरळ यांना तर गुणवंत महिला खेळाडू पुरस्कार रुपाली सुनील गंगावणे यांना प्रदान करण्यात आला. अनिल तुळशीराम थोरात यांची गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली.

सन्मानचिन्ह, मानपत्र व १० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ, बृहमुंबई व ठाणे यांच्याकडून मंडळातील सुरक्षा पर्यवेक्षक राजेश व्ही. सावंत, सुरक्षा रक्षक संदीप भेलकर, आर. वी. नायर आणि सहाय्यक सुरक्षा अधिकारी व्ही. बनकर यांना त्यांच्या विशेष कामगिरीसाठी मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, उपजिल्हाधिकारी तेजस समेळ उपस्थित होते.

Story img Loader