मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. सातही धरणात मिळून सध्या ३५ टक्के पाणीसाठा जमा झाला असून गेल्यावर्षी या कालावधीतील साठ्याच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक आहे.

जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा सातत्याने खालावत होता. यंदा गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी पाणीसाठा धरणात होता. मात्र गेल्या आठवड्याभरातील पावसामुळे सातही जलाशयातील पाणीसाठा वाढू लागला आहे. सातही जलाशयातील पाण्यात वाढ झाली असून गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाणी जमा झाले आहे. सोमवारी सातही धरणात मिळून पाच लाख दशलक्ष लीटरहून अधिक म्हणजेच ३५.११ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत असून मातीतूनही पाणी जलाशयात झिरपत असल्यामुळे पाणीपातळी वाढते आहे.

हेही वाचा >>> छत्रपती संभाजीनगरमधील सोडतीला अखेर मुहुर्त मिळाला, आज गृहनिर्माण मंत्र्यांच्या हस्ते ११३३ सदनिकांसह ३६१ भूखंडांसाठी सोडत

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणातील पाणीसाठा सोमवारी ३५.११ टक्के होता. पाणीसाठा वाढत असून गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाणी जमा झाले आहे. गेल्यावर्षी याचवेळी धरणात ३१ टक्के पाणीसाठा होता. सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. त्यातुलनेत सध्या सात धरणात ५ लाख ८ हजार १०८ दशलक्षलीटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा ७१ हजार दशलक्षलीटरपर्यंत खालावला होता.

हेही वाचा >>> अकरावी प्रवेश प्रक्रिया :दुसऱ्या नियमित फेरीनंतरही दीड लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातही १० टक्के कपात लागू आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यात वाढ होईपर्यंत कपात लागू राहणार आहे.

पाणीसाठा

१५ जुलै २०२४ ……..५ हजार ८ दशलक्ष १०८ लीटर ……. ३५.११ टक्के

१५ जुलै २०२३ ….. ४ लाख ५० हजार ९६५ दशलक्षलीटर …..३१.१६ टक्के

१५ जुलै २०२२ …… १० लाख ८२ हजार ८६२ दशलक्षलीटर …..७४.८२ टक्के

कोणत्या धरणात किती पाणीसाठा

उर्ध्व वैतरणा …….५.६८ टक्के

मोडक सागर …..५५.२३ टक्के

तानसा …..७०.७३ टक्के

मध्य वैतरणा …..३१.५५ टक्के

भातसा ….३३.३३ टक्के

विहार….५३.९९ टक्के

तुलसी….७९.७० टक्के