Uddhav Thackeray Dasara Melava 2024 Live Updates : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची सुरुवात केली होती. तीच परंपरा आता उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून स्वतंत्रपणे दसरा मेळावा आयोजित केला जातो आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा विधानसभा निवडणुका तोंडावर आहे. त्यामुळे या दोन्ही मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानात आयोजित करण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेनुसार दादर येथील शिवाजी पार्क मैदानात होणार आहे. या मेळाव्यांत दोन्ही नेते काय बोलतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दसरा मेळाव्यानिमित्त दोन्ही पक्षांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याचे थेट प्रक्षेपण
एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याचं थेट प्रक्षेपण
Uddhav Thackeray And Eknath Shinde Dasara Melava 2024 Live : थोड्याच वेळात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सुरुवात; उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष!
माझ्या दाढीवरून माझ्यावर टीका केली जाते. मात्र, याच दाढीवाल्याने महाविकास आघाडी उद्धवस्त केली. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका, मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही, अशा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघे यांचा चेला आहे. मला हल्क्यात घेऊ नका. मी मैदान सोडत नाही. आज महाराष्ट्रात एकनाथ शिंदे जातो तिथे माझं स्वागत करतात आशिर्वाद देतात. हेच आपण कमावलं आहे. दोन वर्षात आपलं सरकार लाडकं सरकार झालं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
काही लोकांना हिंदू शब्दाची लाज वाटते आहे. हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ कतरत आहेत. पण आपल्याला हा शब्दाचा अभिमान आहे. बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी करणाऱ्यांपासून आपण शिवसेना मुक्त केली, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन झालं आहे.
शिवसेनेच्या नव्या पर्वाची ही सुरुवात आहे. - संजय राऊत
आदित्य ठाकरे यांनी पहिलं भाषण केलं. शिवसेनेच्या नव्या पर्वाची ही सुरुवात आहे. महाराष्ट्र आज त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघतो आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली
आम्ही दावोसमध्ये गेल्यावर ८०हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणली होती. मात्र, शिंदे सरकारने २४ तासांत ४० कोटी उधळले. प्रत्येक गोष्टीत यांनी घोटाळा केला आहे. त्याच्या फाईल पडल्या आहेत. आमचं सरकार आल्यानंतर सगळ्या फाईल उघडू. राज्यातल्या उद्योग गुजरातला जात आहेत. आमच्या हक्काचं गुजरातला दिलं जात आहे. त्यासाठी मी लढणार, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
स्वत:साठी खोके, राज्याला धोके असा मिंधे सरकारचा कारभार आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
....तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही - आदित्य ठाकरे
आगामी विधानसभेची लढाई महत्त्वाची लढाई आहे. दोन वर्ष आपण ज्या क्षणाची वाट बघतो आहे. तो क्षण लवकर येणार आहे. लवकरच राज्याची निवडणूक जाहीर होणार आहे. जोपर्यंत अदाणी यांचे सगळे काम होणार नाही, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, असं मला एका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. ही लढाई महत्त्वाची आहे. ही लढाई वैयक्तीक नाही, तर महाराष्ट्राची लूट थांबवण्यासाठी ही लढाई आहे. मुंबईला अदाणीच्या घशात घालू द्यायचं का याचा निर्णय जनतेला घ्यायचा आहे. अनेक प्रकल्प मित्रांना वाटप करणं सुरू आहे . ते थांबवण्यासाठी आपल्याचा एकजूट दाखवायची आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली
आज पहिल्यांदा संबोधित करत आहेत. मनात अनेक आठवणी आहेत. लहाणपणी वर्षांतला मोठा दिवस म्हणजे दसरा होता. लहानपणी मी बाळासाहेबांचे भाषण ऐकण्याचं काम केलं. बाळासाहेबांनी याच मैदानात माझ्या हातात तलवार दिली होती. अनेक भाषणं पाहिली आहे, पण १४ वर्षात मी कधीही भाषण केलं नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
गुजरातचे खान महाराष्ट्रात येतात आणि उद्धव ठाकरेंवर टीका करतात. जेव्हा राज्याचे गृहमंत्री विरोधकांना ठोकून काढा म्हणतात. अशा गृहमंत्र्यांनी राज्यात कायदा सुव्यवस्था बोजवारा उडवला आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
राज्यातील सरकार विश्वासघातकी सरकार आहे. जे सरकार विश्वास घात करून आलं आहे ते सर्वांचे विश्वासघातच करणार आहे. मराठा आरक्षणाचं काय झालं? एकनाथ शिंदे यांनी कोर्टात टीकेल असं आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं. दोन दिवसांत निवडणूक जाहीर होणार आहे. मग आरक्षणाची घोषणा कधी करणार आहे. सरकारने ओबीसीत काही जातींचा समावेश केला आहे, तेव्हा भुजबळ कुठे आहेत. नरहरी झिरवळ मंत्रालयातील जाळीवर उडा मारतात याचा अर्थ या सरकारवर कुणाचा वि्श्वास नाहीये, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.
शिवसेनेचे ( उद्धव ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरे तसेच तेजस ठाकरे व्यासपीठावर दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे आज पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, याचा मला आनंद आहे. आणि त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होईल, असा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया निलम गोऱ्हे यांनी दिली.
ज्यांना बहिणीचं नातं कळत नाही. त्यांच्यातील बोलघेवडा आमदारांना बहीण भावाचं नातं कळत नाही. भाऊ बहिणीला पैसै देतो तेव्हा बॅनर लावत नाही. हे लोकं बहिणीची आणि तिच्या गरीबीरीच थट्टा करतात, असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केली..
शिंदे सरकारने लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याचं काम करू नये - सुषमा अंधारे
लाडकी बहीण आम्हाच्या डोळ्यात खुपतं असं फडणवीस म्हणतात. पण आमच्या डोळ्यात खुपण्याचं कारण नाही. १५०० रुपये फडणवीसांनी नागपूरचा बंगला विकून दिले नाही. ते पैसे जनतेचे आहे. शिंदे सरकारने ते फक्त महिलांना देण्याचं काम केलं आहे. सरकार फक्त पोस्टमन आहे. त्यामुळे त्यांनी या योजनेचे श्रेय घेण्याचं काम करू नये, असेही सुषमा अंधारे म्हणाले.
फेक नरेटीव्हचं महानिर्मिती केंद्र देवेंद्र फडणवीस - सुषमा अंधारे
फेक नरेटीव्हचं महानिर्मिती केंद्र देवेंद्र फडणवीस आहे. आरक्षणाची मर्यादा काँग्रेसने वाढवली. १९६० मध्ये भाजपा अस्तित्वातही नव्हती. त्यानंतर १९७० मध्ये पुन्हा राजकीय आरक्षण वाढवलं. तरीही फडणवीस म्हणतात की आरक्षण भाजपाने वाढवलं, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
एकनाथ शिंदे यांनी महापुरुषांचं राजकारण केलं. त्यांना राज्यातील एकही आंदोलन सांभाळता आलं नाही त्यांनी राज्यात दंगली घडवून आणल्या. त्यांनी महाराष्ट्र नासवण्याचं काम केलं. आज तेच आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. १० वर्षांपूर्वी इंदू मिलचं भूमिपूजन केलं. पण त्याची एकही वीट उभी केली नाही. शिवरायांचा स्मारकही अद्याप उभं राहिलं नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
https://www.youtube.com/live/-PPCNm9p1yE?si=V5IL-gFTaCZ0fehn
जातीजातीत मतभेद करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत - सुषमा अंधारे
महाराष्ट्रात सर्व जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. पण त्यांच्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दरी निर्माण करण्याचे काम केलं. लोक विकासावर प्रश्न विचारतील म्हणून त्यांनी जातीजातीमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विकासावर प्रश्न विचारल्यावर त्यांच्याकडे उत्तर नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
"सत्ताधारी आमदार आणि मंत्रीच महिलांबाबत अपशब्द उच्चारत असतील तर या महायुतीच्या सरकारकडून काय अपेक्षा करायच्या? हा महत्वाचा प्रश्न आहे. गेल्या काही वर्षांत अनेक महिला आणि मुली गायब झाल्या. पण तरीही या सत्ताधाऱ्यांना काहीही देणंघेणं नाही. किसान सन्मान निधीचे तुम्ही सहा हजार दिले म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या आहेत का? तीन महिन्यात ५१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली", असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन बानुगडे पाटील यांनी महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल केला.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होतो. बाळासाहेबांनी ही परंपरा सुरु केली. तीच परंपरा उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक विचारांचे सोन लुटण्यासाठी दाखल होत आहेत, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली.
दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट, दादरमध्ये पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दसरा मेळाव्यासाठी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात गर्दी होऊ लागली आहे. मात्र दुपारपासूनच दादर व आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण झाले होते. त्यामुळे दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
आझाद मैदानावरील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहेत. मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी दाखल झाले आहेत. याठिकाणी सांस्कृती कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलं आहे.
संजय राऊत, विनायक राऊत, अंबादास दानवे, सुषमा अंधारेसह शिवसेनेचे ( उद्धव ठाकरे ) नेते व्यासपीठावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात दसरा मेळाव्याला सुरुवात होणार आहे. शिवाजी पार्कवर पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात
शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी सुरु आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. याच शिवाजी पार्क मैदानावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार शक्यता आहे. शिवाजी पार्कातील मैदानावर बॅरिकेटींग करण्यात आले आहेत. त्यासोबतच साधारण दीड ते दोन लाख शिवसैनिक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री मुंबईत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. शिवाजी पार्क मैदानातही सर्वत्र चिखल आहे. आज सकाळपासूनही सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर परतीच्या पावसाचे विघ्न येण्याची शक्यता आहे.
दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या शिवसैनिकांची वाहनं बेलार्ड पिअर, काला घोडा, मुंबई युनिव्हर्सिटी परिसर, चर्चगेट परिसर आणि सीएसएमटी स्थानकाच्या मागील बाजूस पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
शिवसेना ( एकनाथ शिंदे) दसरा मेळाव्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर जय्यत तयारी
शिवसेना ( एकनाथ शिंदे) दसरा मेळाव्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर वीस बाय साठ चा भव्य मुख्य स्टेज बनवण्यात आला आहे. स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. तसेच पंचवीस हजार खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानात आयोजित करण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेनुसार दादर येथील शिवाजी पार्क मैदानात होणार आहे. या मेळाव्यांत दोन्ही नेते काय बोलतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.