आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आज मंत्रालयात जाऊन जोरदार आंदोलन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. दरम्यान पोलिसांनी सुरक्षा जाळीवर उतरून या आंदोलकांना बाहेर काढलं आहे. यावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

धनगर समाजाला आदिवासी समाजाचा दर्जा देण्याची मागणी

धनगर समाजाला आदिवासी समाजाचा दर्जा द्यावा आणि आदिवासींच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाकडून केली जाते आहे. त्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणी उपोषणदेखील सुरू आहे. मात्र, राज्य सरकार आपल्या आंदोलनाकडे लक्ष देत नाही, असा आरोप या आंदोलकांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा – Narhari Zhirwal : VIDEO : पेसा भरतीच्या मुद्द्यावरून नरहरी झिरवळांसह आदिवासी समाजाच्या आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षक जाळीवर मारल्या उड्या

आरक्षणासाठी धनगर समाजाकडून आंदोलन

दरम्यान, राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करणाऱ्या धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी आज थेट मंत्रालयात पोहोचून आपल्या मागण्याचे निवेदन सरकारला देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकार आपले निवेदन स्वीकारत नाही, असा आरोप करत त्यांनी मंत्रायलात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या मजल्यावरून थेट सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलिसांनी या सुरक्षा जाळीवर उतरून आंदोलकांना बाहेर काढलं. यावेळी या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. या आंदोलकांना आता घेण्यात आल्याची माहिती आहे.

चार दिवसांपूर्वी आदिवासी समाजाच्या आमदारांकडूनही आंदोलन

महत्त्वाचे म्हणजे चार दिवसांपूर्वी धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात आदिवासी समाजाच्या आमदारांकडून मंत्रालयात आंदोलन करण्यात आले होते. यावेळीही काही आमदारांनी अशाचप्रकारे सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केलं होते. यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचाही समावेश होता.

हेही वाचा – Devendra Fadnavis Office देवेंद्र फडणवीसांविरोधात अज्ञात महिलेचा असंतोष; मंत्रालयातील कार्यालयाबाहेर घातला गोंधळ, नावाची पाटी खेचत घोषणाबाजी!

विजय वडेट्टीवारांची शिंदे सरकारवर टीका

धनगर समाजाच्या या आंदोलनावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यांनंतर आता धनगर आरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी मंत्रालयातील जाळ्यावर उड्या मारल्या आहेत. महायुती सरकारने महाराष्ट्रातील विविध समाजात किती अस्वस्थता निर्माण केली आहे, याचे हे चित्र आहे. महायुतीने महाराष्ट्राच्या मंत्रालयाची सर्कस करून ठेवली आहे. एका मागून एक आंदोलन होत आहे. पण सरकार अजूनही निष्क्रिय आहे, असे ते म्हणाले.

दोन समाजात निवडणुकीच्या तोंडावर असे वाद लावणे योग्य नाही, या आंदोलनमध्ये जीवाला धोकादेखील आहे. सरकारने तात्काळ यात लक्ष घालून दोन्ही समाजातील असंतोष मिटवावा, अशी मागणीही त्यांनी त्यांनी केली.