मुंबई : धारावीतील मशिदीच्या तोडक कारवाईवरून राजकीय वातावरण तापले असून समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून मुंबई आणि महानगर प्रदेशातील धार्मिक वास्तू तोडक कारवाईबाबत सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली आहे. राजकीय फायद्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी धार्मिक ध्रुवीकरणाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

धारावी येथील ९० फूट रस्त्यावरील अतिक्रमित मशिदीच्या बांधकामावर कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाचे पथक सोमवारी धारावीमध्ये गेले होते. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. प्रशासनाने मशिदीशी संबंधितांना नोटीस बजावली होती. तसेच या नोटीसीनुसार कारवाई हाती घेतली होती. अतिक्रमित बांधकामावर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने चार ते पाच दिवसांची मुदत द्यावी. या मुदतीच्या कालावधीत स्वतःहून बांधकाम हटवण्यात येईल, अशी लेखी विनंती मशिदीच्या विश्वस्तांनी महानगरपालिकेचे परिमंडळ २ चे उपआयुक्त आणि जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्तांकडे केली. त्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली होती. मात्र या कारवाईमुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरण तापणार आहे. याबाबत पालिकेतील समाजवादी पक्षाचे माजी गटनेते व आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे.

हेही वाचा : पालिका अभियंत्याकडे ५५ लाखांच्या खंडणीची मागणी; सहा जणांना अटक, खंडणी विरोधी पथकाची कारवाई

धारावीतील मशिदीला धार्मिक रंग देऊन निवडणूकपूर्व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शेख यांनी पत्रात केला आहे. मुंबई महानगर प्रदेशात अनधिकृत धार्मिक स्थळ, विशेषत: मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यात येण्याची शक्यता आहे. राजकीय फायद्यासाठी समाजात तेढ निर्माण करण्याचा घाट घातला जात असल्याचे शेख यांनी पत्रात म्हटले आहे. शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच अल्पसंख्याक व्यवहार मंत्री अब्दुल सत्तार यांनाही पत्र पाठविले आहे.

हेही वाचा : चोर समजून अल्पवयीन भावंडांची धिंड, विलेपार्लेतील घटना; चार ते पाच संशयितांविरोधात गुन्हा

मुंबई आणि महानगरात विविध धर्मियांची असंख्य अनधिकृत प्रार्थनास्थळे आहेत. तथापि, विशेषत: मुस्लिम समाजाच्या धार्मिक वास्तूंना लक्ष्य करण्याचा हेतू दिसतो. उजव्या विचारसरणीच्या शक्ती हा मुद्दा चिघळवत आहेत, असेही शेख यांनी पत्रात म्हटले आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि एकमत होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावण्याची गरज आहे. तसेच, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे निर्देश द्यावे. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर या विषयावर सर्वपक्षीय बैठक आयोजित करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.