धारावीकरांना हक्काचे पक्के घर देण्याचे स्वप्न राज्य सरकारने दाखविले त्याला पुढच्या महिन्यात १२ वर्षे पूर्ण होत आहेत. पण एक तप पूर्ण झाले तरी स्वप्नातील या घराची एक वीटही अद्याप उभी राहिलेली नाही. दोन वेळा निविदा प्रक्रिया रद्द झाली. आता तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात येत आहेत. निविदा प्रक्रिया, घरांच्या सर्वेक्षणाच्या चक्रातून बाहेर पडून सरकार नव्या इमारती कधी उभ्या करणार, असा प्रश्न धारावीकर विचारू लागले आहेत. त्यातच जागतिक निविदा मागविण्याऐवजी धारावीचा विकास ‘म्हाडा’ या सरकारच्याच उपक्रमाअंतर्गत केला असता तर आम्हाला अधिक फायदा झाला असता असे धारावीकरांचे म्हणणे आहे. तर काहींनी या योजनेमध्ये विकासाच्या फायद्यासाठी पुनर्विकासाचे नियमच धाब्यावर बसविण्यात आल्याचा आक्षेप घेतला आहे. त्यामुळे, या एका तपानंतर सुरू झालेल्या प्रक्रियेविषयीही सामान्य धारावीकर साशंकच आहेत.
विकासकधार्जिणी योजना
धारावी झोपडपट्टी तब्बल ५४० एकर जागेवर उभी आहे. सरकारच्या योजनेनुसार धारावीमध्ये ७ कोटी ५५ लाख १४ हजार चौरस फूट बांधकाम करण्यात येणार आहे. त्यापैकी ३ कोटी २३ लाख ६५ हजार चौरस फूट बांधकामात धारावीकरांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. उर्वरित ४ कोटी ३९ लाख ४४ हजार चौरस फूट बांधकाम विकासकाला मिळणार आहे. आता सरकारने धारावीकरांना ३५० चौरस फुटांचे घर देण्याचे वचन दिले आहे. मात्र धारावीकरांना ४०० चौरस फुटांचे घर हवे आहे. त्यामुळे या योजनेचे घोडे पुन्हा अडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोटय़वधींचा खर्च वाया
सरकारने धारावी पुनर्विकासासाठी ‘धारावी पुनर्विकास प्राधिकरण’ स्थापन केले होते. तसेच सल्लागार, सर्वेअर आदींच्याही नेमणुका झाल्या होत्या. या सर्व यंत्रणेवर गेल्या ११ वर्षांमध्ये सुमारे १०० कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. हा खर्च निव्वळ वाया गेल्याची टीका रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा