बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज (२६ फेब्रुवारी) पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केलाय. रश्मी शुक्ला यांनी ड्रग्ज किंवा अमली पदार्थ व्यवसायाशी संबंध असल्याचं कारण पुढे करत नाना पटोलेंपासून बच्चू कडूंपर्यंत अनेकांची बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केली. खोट्या नावांच्या फोन टॅपिंगसाठी परवानगी घेतली आणि तिथे दुसरीच नावं टाकून फोन टॅपिंग केली, असंही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. यावेळी बोलताना गृहमंत्री वळसे पाटील यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केलेल्या ४ नावांचाही उल्लेख केला.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, “या संदर्भात राज्य सरकारने राज्यातील पोलीस महासंचालकांना आणि आयुक्तांना योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रश्मी शुक्ला दोषी आढळून आल्यामुळे त्यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे तसेच इतर लोकांचे फोन टॅप करण्यात आले होते. ज्यांचे फोन टॅप करण्यात आले होते त्यांचा संबंध ड्रग्ज अथवा तत्सम अमली व्यवसायाशी असल्याचे कारण पुढे करण्यात आले होते.”

“फोन टॅपिंगसाठी व्यक्तींची नावे बदलून दुसऱ्या नावांची परवानगी घेतली”

“देशात कोणत्याही व्यक्तीचा फोन टॅप करायचा असेल तर भारतीय तार अधिनियम १९८५ कायद्यान्वये सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी, आंतरिक सुरक्षेसाठी, दहशतवादी कृतींना प्रतिबंध करण्यासाठी, संवेदनशील दखलपात्र गुन्हे प्रतिबंधित करण्यासाठी तसेच परदेशी मित्रराष्ट्रांचे हितसंबंध राखण्यासाठी अनुमती आहे. परंतु यापैकी कोणतेही कारण नसताना रश्मी शुक्ला यांनी ज्या फोन टॅपिंगसाठी परवानगी घेतली त्यामध्ये व्यक्तींची नावे बदलून दुसऱ्या नावांची परवानगी घेण्यात आली.”

कोणत्या नेत्याची कोणाच्या नावाखाली फोन टॅपिंग?

“फोन टॅपिंग करताना नाना पटोले यांना अमजद खान असं नाव देण्यात आलं. बच्चू कडू यांना निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे यांना तरबेज सुतार व अभिजित नायर, आशिष देशमुख यांना रघु चोरगे व महेश साळुंखे अशाप्रकारची नावे देण्यात आली. या व्यक्ती पुण्यातील कॉलेज विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विकतात असा रिपोर्ट त्यांनी केला होता. त्याआधारे रश्मी शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने ही टॅपिंगची परवानगी मिळवली,” अशीही माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली.

“शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षा केली जाणार”

दिलीप वळसे पाटील म्हणाले, “मागील विधानसभा अधिवेशनात यावर चर्चा उपस्थित झाल्यामुळे चौकशी करण्यात आली. चौकशी अहवाल समोर आल्यानंतरही त्याची सखोल चौकशी केल्यानंतरच कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा सरकारी अधिकाऱ्याने आपल्या जबाबदारीचे भान न ठेवता चुकीच्या पद्धतीने कृती केली, तरी त्या व्यक्तीला शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षा केली जाते.”

हेही वाचा : फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ड्रग्ज व्यवसायाशी…”

“रश्मी शुक्ला या सध्या सेंट्रल डेप्युटेशनवर कार्यरत असल्याने त्यांच्या संदर्भात नेमकी काय कारवाई करण्यात येईल याची कायदेशीर माहिती घेऊन कारवाई करू,” असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. ही कारवाई सूड भावनेतून केली गेली का, अशा आशयाचा प्रश्न माध्यमांद्वारे विचारण्यात आला. त्यावर गृहमंत्र्यांनी असा सूडभावनेचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही, असे सांगत या प्रश्नाचे खंडन केले.

Story img Loader