मुंबईः सहारा समुह प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) लोणवाळ्यातील ॲम्बी व्हॅलीतील ७०७ एकर जमिनीवर टाच आणली. ईडीने पीएमएलए कायदा २००२ अंतर्गत ही कारवाई केली. टाच आणण्यात आलेल्या जमिनीची किंमत १४६० कोटी रुपये आहे. ही जमीन सहारा समुहाशी संबंधित संस्थांकडून वळवलेल्या निधीतून बेनामी खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. कोलकाता ईडीने स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली. याबाबत ईडी अधिक तपास करीत आहे.
देशभर गुन्हे
उडिसा, बिहार आणि राजस्थान पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक) व १२० (ब) (कट रचणे) अंतर्गत मे. हमारा इंडिया क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड व इतरांविरोधात दाखल केलेल्या तीन गुन्ह्यांच्या आधारे ईडीने तपासाला सुरूवात केली होती. त्यानंतर , सहारा समूहाच्या संस्थांविरोधात देशभरात ५०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी ३०० पेक्षा जास्त प्रकरणे पीएमएलए कायद्याअंतर्गत नोंदवली गेली आहेत. गुन्ह्यांमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक, जबरदस्तीने पुन्हा गुंतवणूक करण्यास भाग पाडणे आणि मुदतपूर्ती रक्कम न मिळवून देण्याचे आरोप आहेत.
ईडीच्या तपासात गैरव्यवहाराची माहिती
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, सहारा समूहाने मे. हमारा इंडिया क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, स्टार्स मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, सहारा इंडिया कमर्शियल कॉर्पोरेशन लिमिटेड, सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड, सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व इतर संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक योजना राबविण्यात आली होती. सहारा समूहाने गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे आणि दलालांना भरघोस कमिशनचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. गुंतवणूकदारांकडून गोळा करण्यात आलेला निधी कोणत्याही नियमनाशिवाय, त्यांच्या माहितीस किंवा संमतीशिवाय, मनमानीपणे वापरण्यात आला, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली. संस्थेने मूळ रक्कम परत न करता गुंतवणूकदारांना त्यांची मुदतपूर्ती रक्कम पुन्हा गुंतवण्यास भाग पाडले किंवा त्यासाठी प्रलोभन दिले. एक योजनेतील गुंतवणूक दुसऱ्या योजनेत वळवली गेली. ही फसवणूक लपवण्यासाठी संस्थेने बनावट लेखापुस्तके तयार केली. तेथे पुन्हा गुंतवलेली रक्कम नवीन गुंतवणूक म्हणून दाखवण्यात आली, असे ईडीकडून सांगण्यात आले.
जुन्या गुंतवणूकीतील रकमेची पुन्हा गुंतवणूक
ही गुंतवणूक योजना चालू ठेवण्यासाठी संस्था जुन्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याऐवजी नव्या गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करत होती. जमा केलेल्या पैशांपैकी काही रक्कम बेनामी संपत्ती खरेदीसाठी, वैयक्तिक खर्च करण्यात आली. तपासादरम्यान, सहारा समूहाने काही मालमत्ता विकून त्याबदल्यात रोख स्वरूपात अनधिकृत रक्कम स्वीकारली, त्यामुळे मूळ गुंतवणूकदारांना त्यांचा हक्काचा पैसा मिळू शकला नाही, असेही ईडीला तपासास आढळले. पीएमएलए कायद्याच्या कलम ५० अंतर्गत अनेक गुंतवणूकदार, दलाल, कर्मचारी आणि इतर संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले. तसेच, पीएमएलए कायद्याच्या कलम १७ अंतर्गत टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये ईडीने दोन कोटी ९८ लाख रुपये रोकडही जप्त केली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.