मुंबई : अग्निशमन कार्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा, तसेच ड्रोनचा वापर वाढविण्याबाबत अग्निशमन विभागाने गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नुकतेच व्यक्त केले. राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी राजभवन येथे करण्यात आला. यावेळी मुंबई अग्निशमन दलातील, तसेच राज्याच्या इतर महानगर पालिकांतील आठ अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण अग्निशमन सेवेकरिता जाहीर झालेले राष्ट्रपती पदक राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

मुंबई डॉकयार्ड येथे १९४४ साली झालेल्या जहाजावरील स्फोटात प्राण गमावलेल्या अग्निशमन अधिकारी व जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस पाळला जातो. तसेच या दिवसापासून अग्निशमन सप्ताह पाळला जातो. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राज्यपाल पुढे म्हणाले की, वाढती लोकसंख्या, महानगरांची उर्ध्व दिशेने होणारी वाढ, तसेच वाढती औद्योगिक क्षेत्रे यामुळे आग व इतर आपत्तींना तोंड देणे आव्हानात्मक झाले आहे. रसायनांमुळे उद््भवणाऱ्या आगी, औद्योगिक अपघात, नैसर्गिक संकट, तसेच अतिरेकी हल्ल्यांमुळे अग्निशमन दलापुढे नवनवी आव्हाने ठाकत आहेत. या परिस्थितीत अग्निशमन सेवा दलापुढे पायाभूत सेवा-सुविधांचे रक्षण करणे, सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा जपणे व औद्योगिक संपदेचे संरक्षण करणे ही महत्त्वाची जबाबदारी आली आहे.

मुंबईसारख्या महानगरांमध्ये गृहनिर्माण संस्थांना अग्निसुरक्षेसंबंधी जनजागृती कार्यात सहभागी करून घेतले पाहिजे, तसेच गृहनिर्माण संस्था व औद्योगिक आस्थापनांचे नियमित फायर ऑडिट झाले पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.राज्यपालांनी अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधीला आपले योगदान दिले, तसेच जनतेला निधीसाठी अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला मुंबई अग्निशमन दलाचे, औद्योगिक आस्थापनांचे तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील वरिष्ठ अग्निशमन अधिकारी उपस्थित होते.

अग्निशमन संशोधन संस्था निर्माण करा

अग्निशमन या विषयाचे सर्वंकष अध्ययन करण्यासाठी एक संशोधन संस्था निर्माण केली पाहिजे, अग्निशमन कार्यात नवनवे तंत्रज्ञान वापरले पाहिजे, तसेच अग्निशमन कार्यासाठी पर्यावरण स्नेही अग्निरोधक विकसित केले पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. अग्निशमन कार्यात सेवानिवृत्त अग्निशमन अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग केला पाहिजे. महाविद्यालये, तसेच विद्यापीठांमध्ये युवकांसाठी कमी मुदतीचे अग्निशमन अभ्यासक्रम सुरू केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

आठ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर, मुंबई अग्निशमन दलाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी दीपक घोष, सुनील गायकवाड, लिडींग फायरमन पराग दळवी, फायरमन तातु परब, पुणे महानगरपालिकेतील फायर इंजिन वाहनचालक करीमखान पठाण, सांगली – मिरज – कुपवाड शहर महानगरपालिकेतील फायरमन कसप्पा लक्ष्मण माने व पुणे महानगरपालिकेतील फायर अटेंडण्ट नरसिंहा पटेल यांना राज्यपालांनी यावेळी राष्ट्रपती पदक प्रदान कले.