शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानावर झालेल्या वज्रमुठ सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली. यानंतर आता एकनाथ शिंदेंनी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उठाबावाले असा उल्लेख करत प्रत्युत्तर दिलं. ते सोमवारी (१ मे) महाराष्ट्र दिनानिमित्त कळवा (पश्चिम) येथे आयोजित ‘मराठी बाणा’ कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे म्हणाले, “नजर पोहचत नाही तिथपर्यंत, मागील महामार्गापर्यंत लोक बसलेले आहेत. खरं म्हणजे मुंबईत आज एक सभा आहे. तिकडे खूप मेहनत करून लोकांना आणलं आहे, पण इकडं काही न करता अशोक हांडेंचा चमत्कार दिसत आहे. खरी एकजूट आणि विकासाची वज्रमुठ इथं पाहायला मिळत आहे. म्हणून मी उपस्थित सर्वच ठाणेकरांचं मनापासून स्वागत करतो.”

“कुणीच मुंबई तोडण्याची हिंमत करू शकत नाही”

“आपण मुंबईत सुधारणा करत आहोत. निवडणुका आल्या की, काही लोक म्हणतात मुंबई तोडणार, मुंबई तोडणार. कोण मुंबई तोडणार आहे? कुणीच मुंबई तोडण्याची हिंमत करू शकत नाही. ही हिंमत करताही येणार नाही. हे स्वप्न कुणी पाहू नये. मुंबई तोडणार असं सांगून मुंबईकरांची मतं घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या प्रयत्नाला यश मिळणार नाही. कारण मुंबईत आम्ही काम करत आहोत. मुंबई बदलते आहे हे मुंबईकर जाणून आहेत,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“जनतेला खालच्या दर्जाची भाषा आवडत नाही”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेला आरोप-प्रत्यारोप, खालच्या दर्जाची भाषा आवडत नाही. त्यामुळे ही पोटदुखी सुरू झाली आहे. ही पोटदुखी वाढणार आहे म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखानाही तयार करून ठेवला आहे. त्यांनी तिकडे जाऊन मोफत औषध घ्यावं.”

व्हिडीओ पाहा :

https://fb.watch/kfNNjk-4Nf/

“उबाठावाल्यांना काय बोलायचं हे सुचतच नाही”

“बऱ्याच लोकांना मुख्यमंत्री व्हायची स्वप्नं पडली आहेत. सकाळी एकाला मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पडतं, दुपारी एकाला पडतं आणि संध्याकाळीही पडतात. ते उबाठावाले आहेत त्यांना काय बोलायचं हे सुचतच नाही. त्यांना स्वप्न पाहत राहू दे. शेवटी आमदार असो की मुख्यमंत्री, कुणाला बसवायचं आणि कुणाला उतरवायचं हे सर्व जनता जनार्दनाच्या हातात असतं,” असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोले लगावले.

हेही वाचा : VIDEO: “देशाचे पंतप्रधान द्रौपदी मुर्मू”, अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चुकांचा पाढा वाचत खरडपट्टी काढली, म्हणाले…

“आजचा सत्कार ठाणेकरांचा, आपल्या परिवारातील”

“आज मला या ठिकाणी बोलावलं, माझा सन्मान केला, सत्कार केला. खरंतर मुख्यमंत्री झाल्यावर मला महाराष्ट्रात जाण्याचा योग आला. अनेक ठिकाणी सत्कार समारंभही झाले. परंतु आजचा सत्कार ठाणेकरांचा, आपल्या परिवारातील आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी मोठा आहे,” असंही यावेळी त्यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde criticize vajramuth sabha of uddhav thackeray in mumbai pbs
Show comments