मुंबई : इतर मागासवर्ग (ओबीसी) समाजाच्या राजकीय आरक्षणाशिवाय राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींसाठी १८ ऑगस्टला निवडणूक होणार आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यावर होणाऱ्या या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसोटी लागणार आहे.
अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, गिरीश महाजन, छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे आदी नेत्यांच्या मतदारसंघांत निवडणुका होत असल्याने या नेत्यांना आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील. एकीकडे नागरिकांच्या इतर मागास प्रवर्ग(ओबीसी) आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ नयेत , अशी सर्वपक्षीय भूमिका असताना राज्यातील १७ जिल्ह्यांतील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतीसाठी येत्या १८ ऑगस्ट रोजी निवडणूक घेण्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी केली.
राज्यात सत्तांतर होताच पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ नयेत अशी मागणी सर्वच पक्षांचे नेते करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयात येत्या मंगळवारी पुढील सुनावणी होणार असतानाच राज्य निवडणूक आयोगाने ९६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाने मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणाशिवाय १७ जिल्हयातील नगरपालिकाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. कमी पर्जन्यमान असलेल्या भागांमध्ये पावसाळय़ात निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार या निवडणुका होत आहेत.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये?
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलढाणा. बारामती, भुसावळ, बार्शी, जालना, बीड, उस्मानाबाद या अ वर्ग नगरपालिकांचा समावेश आहे.
होणार काय?
या पालिकांसाठी २२ ते २८ जुलै पर्यंत उमदेवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून २९ जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ ऑगस्ट असून १८ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे. तर १९ ऑगस्टला मतमोजणी होईल.