Mumbai Boat Accident : मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच या बोटमधून १०१ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

नेमकं घटना काय घडली?

मुंबईवरून एलिफंटाकडे नीलकमल ही बोट जात होती. मात्र, या बोटीला गेट ऑफ इंडियाजवळ ही बोट बुडाल्याची घटना घडली. या बोटेतून १०० पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. ही दुर्घटना घडल्यानंतर लगेचच तातडीने मदतकार्य करण्यात आले. यावेळी नौदलाने या बोटीमधील १०१ प्रवाशांना सुरक्षित वाचवलं. तर या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अद्यापही नौदलाकडून आणि पोलिसांच्या समन्वयाने बचाव कार्य करण्यात येत आहे. यामध्ये चार नौदलाचे हेलिकॉप्टर, ११ नौदल क्राफ्ट आणि एक तटरक्षक दलाची नौका आणि तीन सागरी पोलीस नौका बचावकार्य करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा : Gateway Of India Boat Accident : स्पीडबोटची टक्कर आणि एलिफंटाला जाणारी ‘नीलकमल’ बोट बुडाली, नेमका कसा झाला अपघात?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं?

“मुंबई शहराजवळ अरबी समुद्रात नीलकमल कंपनीच्या एका प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत सायं.७.३० पर्यंत प्राप्त माहितीनुसार, बोटीतील एकूण प्रवाशांपैकी १०१ लोकांना सुरक्षित वाचवण्यात आलं आहे. नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलाच्या डॉक्टरांनी सायंकाळी ७.३० पर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात ३ नौदलाचे जवान असून १० नागरिक आहेत. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.तसेच २ गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्टगार्ड, मुंबई पोलिस यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. या बचावकार्यात नौदलाचे ११ क्राफ्ट आणि ४ हेलिकॉफ्टर्सची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरुच आहे. त्यामुळे सविस्तर माहिती उद्यापर्यंत प्राप्त होईल. मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे.

प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने नेमकं काय सांगितलं?

अपघातानंतर प्रवाशांना किनाऱ्यावर आणण्यात आलं. त्यापैकी एका प्रवाशाने सांगितलं, आमची बोट पाच ते सात किमी समुद्रात होती. त्यावेळी मी बोटीच्या डेकवर उभा होतो. एक स्पीड बोट आमच्या आजूबाजूला फिरत होती. ही स्पीड बोट आम्हाला धडकू शकते अशी भीती मला वाटली. नेमकं घडलंही तसंच. ही स्पीडबोट भरधाव वेगाने आली आणि आमच्या बोटीला जोरात धडकली. त्यावेळी स्पीडबोटमधल्या काही प्रवाशांचा मृत्यू झाला तर दुसऱ्याचा पाय कापला गेला. रक्तबंबाळ अवस्थेतल्या त्या जखमी प्रवाशाला आमच्या बोटीत घेण्यात आलं. स्पीडबोटची धडक जोरात बसल्याने आमच्या बोटीत पाणी शिरु लागलं आणि बोट बुडू लागली अशी माहिती या प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने दिली आहे. एबीपी माझा या वाहिनीशी बोलताना ही माहिती त्याने दिली.