मुंबई : कांदिवली चारकोप येथे माथाडी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी दिलेल्या सुमारे २८ एकरपैकी ८ एकर इतक्या खुल्या शासकीय भूखंडावर राजरोसपणे होत असलेल्या अतिक्रमणांविरुद्ध अखेर कारवाई करण्यात आली. ही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यास आली आहेत.सामाजिक कार्यकर्ते रेजी अब्राहम यांनी ही बाब छायाचित्रांद्वारे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. अखेर अब्राहम यांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर नायब तहसीलदार अजय पाटील यांनी या बेकायदा बांधकामांविरुद्ध नोटीस जारी केली. या नोटिशीत ही सर्व अतिक्रमणे काढून टाकून भूखंड मोकळा करण्याचे आदेश कापड बाजार आणि दुकाने मंडळाच्या उपायुक्तांना दिले होते. अन्यथा अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा इशारा दिला होता. अखेर ही बांधकामे पाडण्यात आली आहेत.
माथाडी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी हा भूखंड देण्यात आला होता. या पैकी ८ एकर वगळता अन्य भूखंडावर माथाडी कर्मचाऱ्यांसाठी इमारती बांधण्यात आल्या आहेत. या इमारतीही आता मोडकळीस आल्यामुळे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे येऊ लागली होती. ही बाब वेळोवेळी नजरेस आणून देऊनही उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते.