लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने मृतदेहाच्या दहनासाठी स्मशानभूमीत पर्यावरणपूक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरातील एकूण ९ ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळतानाच वायू प्रदूषण टाळण्यासाठी या पद्धतीचा वापर उपयुक्त ठरणार आहे.

स्मशानभूमीत विद्युत दाहिनी आणि गॅसदाहिनीसह आता पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेच्या वापरामुळे प्रदुषण कमी होण्यास आणखी मदत होईल. मुंबई शहरात भोईवाडा स्मशानभूमी, गोवारी स्मशानभूमी (वडाळा), वैंकुठधाम स्मशानभूमी (रे रोड) तसेच पूर्व उपनगरांत टागोर नगर स्मशानभूमी (विक्रोळी), देवनार कॉलनी स्मशानभूमी (गोवंडी), अमरधाम पोस्टल कॉलनी (चेंबूर) आणि पश्चिम उपनगरात बाभाई स्मशानभूमी (बोरिवली), ओशिवरा स्मशानभूमी, शिवधाम स्मशानभूमी (गोरेगाव) येथे पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. मृतदेहाच्या दहनासाठी लाकडाऐवजी पर्यायी इंधन म्हणून ब्रिकेट्स, पॅलेट्स बायोमास वापरण्यासाठी १४ स्मशानभूमी निश्चित करण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा-राज्यराणी, देवगिरी, हिंगोली जनशताब्दीला डिझेलऐवजी विद्युत इंजिन

सध्या मुंबईतील विविध स्मशानभूमीच्या ठिकाणी लाकडी चिता, विद्युत दाहिनी आणि गॅस शवदाहिनीचा वापर मृतदेहाच्या दहनासाठी करण्यात येतो. सद्यस्थितीत १० स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिनी आणि १८ ठिकाणी गॅस शवदाहिनी बसविली आहे. आता ९ विद्युतदाहिनीच्या ठिकाणी पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी २०२० साली शीव येथील स्मशानभूमीत लाकडी दहन यंत्रणेचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. त्यानंतर नऊ ठिकाणी ही पद्धती अंमलात आणण्यासाठीची निविदा प्रक्रिया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यांत्रिकी आणि विद्युत विभागामार्फत सुरू आहे.

आणखी वाचा- मुंबई : उपकरप्राप्त अतिधोकादायक इमारतीत अजूनही १७५ कुटुंबाचे वास्तव्य

प्रत्येत मृतदेहाच्या दहनामागे २५० किलो इतक्या लाकडाची बचत

दाहिनीच्या भट्टीच्या विशिष्ट रचनेमुळे कमीत कमी लाकडांचा वापर होतो. परिणामी, प्रदुषणात घट होते. प्रत्येत मृतदेहाच्या दहनासाठी लागणाऱ्या ३५० किलो ते ४०० किलो लाकडांच्या तुलनेत १०० ते १२५ किलो इतक्या लाकडांचा वापर या यंत्रणेत होतो. त्यामुळे सरासरी २५० किलो इतक्या लाकडाची बचत प्रत्येक दहनाच्या प्रक्रियेत होणार आहे. या यंत्रणेमुळे कार्बन उर्त्सजनाचे प्रमाणही कमी होण्यास मदत मिळेल. ऊर्जा वहनासाठी तसेच चिमणीतून कमीत कमी धूर पर्यावरणात पसरेल, अशा पद्धतीने दहन यंत्रणेची रचना करण्यात आली आहे. वॉटर स्क्रबर आणि सायक्लोनिक सेपरेटरमध्ये वायू प्रदूषकांमधील कण व विषारी वायू काढून टाकले जातात. या प्रक्रियेनंतर निर्माण झालेली हवा ३० मीटर उंच चिमणीमधून हवेत सोडली जाते.