खासदार राजू शेट्टी, बाळासाहेब थोरात, पाशा पटेल, उमेशचंद्र सरंगीसह विविध मान्यवरांचा सहभाग

मुंबई : शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, कृषी उद्योगाचे सध्याचे स्वरूप आणि त्याची भविष्यातील दिशा यांचा वेध ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या नव्या पर्वात घेण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह कृषी उद्योगाशी संबंधित विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत.

वैचारिक आदान-प्रदान आणि भोवतालच्या समस्यांचा उपाययोजनेच्या दृष्टीने एकात्मिक विचार करण्याची परंपरा हे ‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाचे वैशिष्टय़ आहे. यंदा शेती व शेतीशी संबंधित व्यवसाय आणि व्यवस्था यावर गुरुवार, २१ आणि शुक्रवार, २२ फेब्रुवारीला विचारमंथन होणार आहे. राज्याचे कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल.

चर्चासत्राच्या पहिल्या दिवशी गुरुवार २१ फेब्रुवारी रोजी याविषयावर खा. राजू शेट्टी, कृषी विश्लेषक उदय तारदाळकर, कृषी विश्लेषक राजेंद्र जाधव हे कृषी उद्योगाचे अर्थशास्त्राची समीकरणे उलगडून सांगतील.

दुसऱ्या सत्रात इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू गणपती यादव आणि पुण्यातील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य प्रमोद रसाळ हे तज्ज्ञ कृषीक्षेत्रातील संशोधनाचा आढावा घेतील.

अन्न प्रक्रिया उद्योगाच्या सद्यस्थितीवर बोर्डीच्या हिल झिल रिसॉर्ट अँड वाईनरीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत सावे, मधुमक्षिका पालन केंद्राच्या प्रमुख लक्ष्मी राव, नाशिक येथील वरुण अ‍ॅग्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा धात्रक विचार मांडतील.

चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार २२ फेब्रुवारी रोजी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि एमसीएक्सचे व्यवस्थापकीय संचालक मृगांक परांजपे वायदा बाजार आणि बाजारपेठच्या शेतीवरील परिणामांची चर्चा करतील. दुसऱ्या सत्रात शेतीमधील नव्या प्रयोगांची, सेंद्रीय शेतीची गाथा विज्ञाननिष्ठ शेतीचा प्रयोग राबवणारे अरुण देशपांडे, सेंद्रीय शेती करणारे व्यंकट अय्यर आणि कृषीतज्ज्ञ सुधीर भोंगळे हे घेतील.

तिसऱ्या सत्रात कृषी विमा, गोदामांची व्यवस्था यावर निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी, कृषीतज्ज्ञ गिरधर पाटील मार्गदर्शन करतील.

तर चर्चासत्राचा समारोप माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भाषणाने होईल.

या विषयांवर मंथन

*  कृषी उद्योगाचे अर्थशास्त्र

* कृषी संशोधन

* फळ प्रक्रिया उद्योग

* कृषी विमा-गोदाम व्यवस्था

* शेतमालाचे वायदे व्यवहार आणि बाजारपेठ

* आधुनिक-प्रयोगशील शेती

* कार्यक्रम कधी- गुरुवार, २१ आणि शुक्रवार २२ फेब्रुवारी

* उद्घाटन – चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री

* सहप्रायोजक -एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर

* या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ९८६७७८५१११ या भ्रमणध्वनीवर दिनकर सांबारे यांच्याशी संपर्क साधावा.

Story img Loader