मुंबई : राज्यात गेल्या महिन्यापासून डोळे येण्याची साथ सुरू झाली आहे. आतापर्यंत या आजाराची पाच लाख ३५ हजार ८५९ जणांना बाधा झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मात्र गेल्या सात दिवसांमध्ये रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून या कालावधीत १७ हजार नवे रुग्ण आढळले. ऑगस्टच्या सुरुवातीपासून राज्यामध्ये डोळे येण्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. त्यानंतर दररोज साधारणपणे १० हजारांहून अधिक रुग्ण राज्यामध्ये सापडत होते. परिणामी, ही साथ झपाटय़ाने पसरत असल्याचे निदर्शनास आले. बुलढाणा रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत डोळे आलेले तब्बल पाच लाख ३५ हजार ८५९ रुग्ण सापडले आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.