रायगड जिल्ह्यात सामाजिक बहिष्काराचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून गावकीच्या विरोधाला डावलत नोंदणीकृत विवाह केला म्हणून एका कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलादपूर तालुक्यातील सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची ही  तिसरी घटना आहे.
दिवील गावातील जनार्दन नारायण देवे याने २०१२ मध्ये गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि ग्रामस्थांचा विरोध डावलून तालुक्यातील साखर येथील राजश्री लक्ष्मण तांदळेकर या मुलीशी नोंदणीकृत पद्धतीने विवाह केला होता. याचा राग मनात धरून ऑक्टोबर २०१२ मध्ये गावातील भरीच्या देवळामध्ये गावकीची बठक घेऊन नारायण देवे यांच्या कुटुंबाला ७० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम गावकीमध्ये जमा न केल्यास त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर दंड भरला नाही म्हणून देवे कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आले. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. वेळोवेळी अपमानास्पद वागणूकही देण्यात आली.  
याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात अनिल भिलारे, ज्ञानेश्वर भिलारे, विलास सोनावणे, आकाश कदम, सहदेव देवे यांच्यासह २१ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Family buycotts after getting registered marriage in raigad