मुंबई : प्रशांत महासागरात अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर ला – निनाची स्थिती सक्रीय झाली आहे. पण, ला – निना स्थिती खूपच कमकुवत असून, जेमतेम अडीच महिने म्हणजे मार्च अखेरपर्यंत सक्रीय राहण्याची शक्यता आहे. ला – निना कमकुवत असल्यामुळे भारतावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. श्रीजित यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरात ला – निना स्थिती निर्माण झाली आहे. प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा ०.७ अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. त्यामुळे ला – निना स्थिती निर्माण झाली, असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षाच ही स्थिती कमकुवत आहे, हेच तापमान सरासरीपेक्षा ०.९ अंश सेल्सिअसने कमी झाले असते तर ला – निनाची स्थिती मजबूत आहे, असे म्हणता आले असते. कमकुवत ला – निना स्थिती मार्चअखेर सक्रीय राहण्याची शक्यता आहे. शिवाय कमकुवत ला – निनामुळे जागतिक हवामानावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. भारतीय उपखंड आणि भारतावरही फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.
भारतीय हवामान विभागासह जागतिक हवामान संघटना आणि अमेरिकेची हवामान संघटना जुलैअखेर पासून ला – निना सक्रीय होण्याचा अंदाज व्यक्त करीत आहेत. जुलैअखेर पासून डिसेंबर अखेरपर्यंत ला – निना सक्रीय झाला नव्हता. पावसाळ्याचे चार महिने प्रतिक्षा करूनही आणि शक्यता असूनही ला – निनाने हुलकावणी दिली होती.

हेही वाचा – वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण

हेही वाचा – ज्येष्ठ वकील इक्बाल छागला यांचे निधन

देशावर फारसा परिणाम नाही

जानेवारीपासून ला – निना स्थिती निर्माण झाली आहे. पण, खूप कमकुवत आहे. किमान मार्चच्या मध्यापर्यंत ला – निना स्थिती राहील. महाराष्ट्र आणि देशावर या ला – निनाचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. हिवाळ्याच्या सुरुवातीला ला – निना सक्रीय झाला असता तर तुलनेने थंड हिवाळा अनुभवता आला असता. आता तेही शक्य दिसत नाही, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finally la nina active but weak it will only last for three months no effect on india mumbai print news ssb