शैलजा तिवले

मुंबई : पोषण आहाराचा अभाव आणि जंकफूडचे अतिसेवन यामुळे किशोरवयीन बालके तीव्र कृश होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अहवालातून (एनएफएचएस-५) निर्दशनास आले आहे. तसेच या बालकांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाणही वाढत असल्याचे आढळले आहे. एनएफएचएसच्या पाचव्या अहवालामध्ये १५ ते ४९ वयोगटातीव व्यक्तींचे सर्वेक्षण केले असून यामध्ये बॉडी मास इंडेक्सचे (बीएमआय) मापन केले आहे. बीएमआयचे मापन व्यक्तीची उंची आणि वजन यांच्यावरून केले जाते. बीएमआयनुसार १५ ते ४९ वयोगटातील सुमारे आठ टक्के महिला, मुली तर सुमारे सात टक्के पुरुष, मुले हे तीव्र कृश असल्याचे यात नमूद केले आहे. यामध्ये १५ ते १९ या किशोरवयीन बालकांमध्ये तीव्र कृशपणा सर्वाधिक असल्याचे आढळले आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांमध्ये तीव्र कृशपणाचे प्रमाण जास्त असल्याचे यात प्रामुख्याने आढळले आहे.

मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये कृशपणाचे प्रमाण अधिक

 १५ ते ४९ वयोगटातील महिलांमध्ये सर्वाधिक सुमारे १८ टक्के किशोरवयीन मुली तीव्र कृश आहेत. तर २० ते २९ या तरुण वयोगटातील कृश मुलींचे प्रमाण ८.४ टक्के आहे. ३० वर्षांवरील महिलांमध्ये हे प्रमाण पाच टक्क्यांच्याही खाली आहे. १५ ते ४९ वयोगटातील पुरुषांमध्ये सर्वाधिक सुमारे २० टक्के किशोरवयीन मुले कृश आहेत. २० ते २९ या तरुण मुलांच्या गटामध्ये हे प्रमाण पाच टक्के आहे, तर ३० वर्षांवरील व्यक्तींमध्ये तीन टक्क्यांइतके कमी आहे.

Story img Loader