मुंबई : पवई येथील गोपाल शर्मा इंटरनॅशनल स्कूल नजीकच्या साई सॅफायर या २२ मजली इमारतीच्या सतराव्या मजल्यावर गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास आग लागली. आग आणि धुरामुळे इमारतीत अडकलेल्या ५० ते ६० रहिवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. त्यामुळे मोठी हानी टाळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.
साई सॅफायर या बहुमजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावर आग लागताच रहिवाशांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. सुरक्षेसाठी रहिवाशांनी तात्काळ इमारतीवरबाहेर पळ काढला. मात्र, काहीच क्षणात आगीची तीव्रता वाढल्यामुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे अनेकांना बाहेर पडता आले नाही. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य हाती घेतले. तसेच पोलीस, अदानी आणि संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले.
९ ते २१ व्या मजल्यापर्यंत आग पसरली
सातत्याने वाढत चाललेल्या आगीमुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्येही भीती पसरली होती. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने ९ वाजून ५८ मिनिटांनी आगीला क्रमांक एकची वर्दी दिली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध अद्ययावत यंत्रणांच्या साहाय्याने अग्निशामकांचे प्रयत्न सुरूच होते. मात्र, धुरामुळे आग आटोक्यात आणण्यात त्यांना अडथळे आले.
दरम्यान, आगीत इमारतीतील विद्युत यंत्रणा, विद्युत तारा, लाकडाचे सामान, इमारतीतील अन्य वस्तू जळून खाक झाल्या. आग नऊ ते २१ व्या मजल्यापर्यंत पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफीने शिड्यांच्या साहाय्याने रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले. अखेर प्रयत्नांची पराकाष्टा करत दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्याची चौकशी सुरु आहे.