मुंबई ते गोवा प्रवास करण्यासाठी आता विमान, ट्रेन आणि रस्त्याशिवाय जलमार्गाचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. मुंबई ते गोवा जलमार्गावर भारतातील सर्वात पहिली प्रवासी क्रूझ सेवा सुरु करण्यात आली असून बुधवारी उद्धाटन करण्यात आलं. चाचणीसाठी आंग्रिया ही क्रूझ मुंबईच्या किनारपट्टीवर नव्याने उभारण्यात आलेल्या टर्मिनलहून गोव्याला रवाना झालं. गुरुवारी सकाळी क्रूझ गोव्याला पोहोचली. तिकीट दर काय ? क्रूझने प्रवास करायचा विचार करत असला तर खिसा थोडा हलका करावा लागेल. तिकीटाची किंमत ७ हजारापासून सुरु होत आहे. रस्ता, रेल्वे आणि विमाना प्रवासाशी तुलना करता क्रूझचा प्रवास सर्वसामान्यांसाठी तसा महागच आहे. ज्यांना सोयीसुविधांसोबत प्रवास करण्याची इच्छा आहे त्यांनाच हा प्रवास परवडणारा असून, कंपनीदेखील अशाच प्रवाशांना टार्गेट करणार आहे. मुंबई ते गोवा वॉल्वो बसने प्रवास करायचा म्हटलं तर १००० ते २५०० रुपये तिकीट आहे. विमानाने प्रवास करायचा असेल तर ३५०० ते ७००० रुपये खर्च करावे लागतात. रेल्वेने प्रवास करायचा असेल आणि त्यातही तेजसने तर तिकीट २६०० रुपये आहे. ७००० रुपयांत काय मिळणार ? क्रूझने प्रवास करताना मुंबई - गोव्याच्या किनारपट्टीवरील निसर्गाचा आनंद तर घेता येणारच आहे. पण याशिवाय तुम्हाला दोन वेळचं जेवण आणि नाश्ता मिळणार आहे. तसंच स्विमिंग पूलमध्ये जाऊन पोहण्याचा आनंदही घेऊ शकता. क्रूझमधील कर्मचारी तुमच्या सेवेसाठी नेहमी हजर असतील. तसंच परिसराचं ऐतिहासिक महत्व तुम्हाला सांगतील. या क्रूझमध्ये आठ वेगवेगळे रेस्टॉरंट्स असणार आहेत. सोबतच कॉफी शॉप, रिक्रिएशन रुम, लाँज आणि स्विमिंग पूल असणार आहे. एकावेळी क्रूझमध्ये ३५० प्रवासी प्रवास करु शकतात. वेळ काय आहे ? सध्या क्रूझ सेवा सुरु झाली नसली तरी चाचणी केली जात आहे. मुंबईतून संध्याकाळी ५ वाजता क्रूझ रवाना होईल, जी सकाळी ९ वाजता गोव्याला पोहोचेल. मुंबईसाठी क्रूझ सेवा एक दिवसाच्या अंतराने सुरु असेल.