चालकांची कमतरता भरून काढण्यासाठी कंत्राटी चालकांची भरती करण्याची योजना महामंडळाने रद्द केली आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या संपात चालकांविना एसटी उभ्या असल्याने प्रवाशांचे हाल झाले. हे हाल थांबवण्यासाठी एसटी महामंडळाने कंत्राटी चालकांची भरती करून एसटी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संप मिटताच कंत्राटी चालकांची संख्या कमी करण्यात आली.
हेही वाचा- मुंबई-पुणे मार्गावर डिसेंबरपासून धावणार विजेवरील ‘शिवाई’ बस
मुदत संपल्याने काही चालकांना मुदतवाढही देण्यात आली. मात्र, महामंडळाला आणखी चालकांची गरज भासत होती. काही चालकांची अन्य विभागात बदली झाल्यानंतर तीन ते पाच वर्षानंतर अनेकांनी पुन्हा आपल्याच भागात बदली करून घेतल्याने मनुष्यबळाची असमतोल उपलब्धता आहे. चालकांअभावी एसटी गाड्याही आगारात उभ्या राहतात. परिणामी, प्रवाशांचे हाल होतात. कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिकसह अन्य काही विभागात ही समस्या असून यातून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर पाच हजार कंत्राटी चालकांची भरती करण्यासाठी जून २०२२ पासून निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली होती.
हेही वाचा- मुंबई महानगरपालिकेच्या १२ उद्यानांचा खासगी संस्थेकडून गैरवापर
दरम्यान २०१६-१७ व २०१९ मध्ये राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या चालक कम वाहक संवर्गातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रियेला करोना काळात तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. संप काळातही हे काम थांबले. स्थगिती उठवल्यानंतर बहुतांश चालकांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले. मात्र नियुक्ती न झाल्याने एसटी महामंडळाकडे उमेदवार विचारणा करत होते. अखेर या चालक कम वाहकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पाच हजार कंत्राटी चालकांची भरती रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहीती एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.