साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा नेता- शरद पवारआर. आर. पाटील यांचे निधन व्यक्तीश मला स्वत:ला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का आहे. प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निभावताना त्यांनी स्वत:च्या कर्तृत्त्वाची झलक दाखविली. दहा वर्षांपूवी संत गाडगेबाबा अभियानाच्या रूपाने त्यांनी एक महत्त्वपूर्ण काम केले. आर. आर. म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा नेता होता. गेल्या तीन महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. या काळात आम्ही त्यांच्या वैद्यकीय जाणकारांशी सातत्याने संपर्क ठेवून होतो. मी रोज जातीने त्यांची विचारपूस करत होतो. पण शेवटी ते आपल्यातून निघून गेले. त्यांना माझ्याकडून अंतकरण:पूर्वक श्रद्धांजली. आर. आर नाहीत ही गोष्ट आम्हाला पचावणं खूप अवघड जाईल. नव्या पिढीचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघत होतो. आज मी आणि पक्ष ज्याठिकाणी आहोत त्यामध्ये आर. आर. यांचे योगदान आहे. सत्तेच्या महत्त्वाच्या पदावर असतानाही त्यांनी साधेपणाने सांभाळला. मुंबई बॉम्बस्फोटासारख्या चिंतेच्या क्षणाप्रसंगी सत्तेचा त्याग करण्याची हिंमत त्यांनी दाखविली.आर.आर. यांच्यासारखा हजरजबाबी नेता आजपर्यंत बघितला नाही- देवेंद्र फडणवीसआर. आर. यांच्या रूपाने अत्यंत संवेदनशील नेता, उत्कृष्ट संसदपटू आणि एक सच्चे व्यक्तिमत्व आमच्यातून निघून गेले, हे आमच्यासाठी धक्का आहे. राजकारणात वेगळी प्रतिमा तयार करणारा नेता. त्यांनी नेहमीच सामान्य माणसासाठी राजकारण केले. नेहमीच वेगळ्या पद्धतीने राजकारण करणारा नेता आमच्यातून निघून गेला याचे दुख: आहे. आर. आर. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील आणि एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येईल. त्यांचे निधन महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. आजवरच्या माझ्या विधानसभेच्या कारकीर्दीत मी आबांसारखा हजरजबाबी नेता बघितलेला नाही. एखाद्या गोष्टीमागील तत्वज्ञान मांडण्याची त्यांची हातोटी अफलातून होती.आर. आर. पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी- नरेंद्र मोदीआर.आर. पाटील यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दु:ख झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुखा:त सहभागी आहे. My thoughts are with Shri RR Patil's family.Am saddened to know of his demise, which leaves a void in Maharashtra politics: PM @narendramodi— PMO India (@PMOIndia) February 16, 2015संवेदनशील नेता गमावला – विनोद तावडेमाजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते आर. आर. पाटील यांच्या निधनाने समाजातील तळागाळातील सामान्य जनतेशी सातत्याने संपर्क असणारा राजकारणातील एक संवेदनशील नेता गमावल्याची भावना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.सामान्य कार्यकता ते उपमुख्यमंत्री असा प्रवास करणारे आर.आर. आबा यांची नाळ नेहमीच सामान्य कार्यकर्त्यांशी कायम जोडली गेली होती. विधीमंडळात काम करीत असताना गृहमंत्री म्हणून त्यांच्याशी नेहमीच वादावादी होत असे, परंतु त्यामुळे आमच्या संबंधात कधीही कटूता आली नाही. आपण राजकारणातील एक व्यक्तिगत मित्र गमाविला असे श्री.तावडे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.गेल्या तीन महिन्यांपासून तोंडाच्या कर्करोगाने आजारी असलेल्या श्री. पाटील यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अयशस्वी ठरली. उत्तम लोकप्रतिनिधी, उत्तम संसदपटू, उत्तम प्रशासक म्हणून ते सर्वांना परिचित होते. असल्याचे श्री. तावडे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.आबांच्या निधनामुळे एक आदर्श व्यक्तिमत्व हरपलं- अण्णा हजारेआबांच्या निधनामुळे एक आदर्श व्यक्तिमत्व हरपलं, एक आदर्श उपमुख्यमंत्री हरपला, एक आदर्श कार्यकर्ता हरपला. त्यांनी महाराष्ट्रामध्ये ग्रामस्वच्छता अभियानासारख्या महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या. मी कधीही कोणाही नेत्याच्या प्रचाराला जात नाही. मात्र, मला आबा अडचणीत आहेत कळलं, तेव्हा मी त्यांच्या प्रचारासाठी गेलो. कारण, असा माणूस व्यवस्थेत असणं आवश्यक होतं. उत्तम वक्ता, सभागृहात प्रश्न मांडणारा प्रभावी नेता.- अशोक चव्हाणआज सकाळी मी त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. मात्र, आत्ता त्यांच्या निधनाची दुख:द बातमी ऐकून मला विश्वास बसत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून आजाराशी लढा देत होते. त्यांच्या जुन्या अनेक आठवणी आहेत. शंकरराव चव्हाण साहेब आबांची नेहमीच तारीफ करत असत. सभागृहातही असच काम करत राहा असे नेहमीच सांगत असे. राज्याचा मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याबरोबर काम केले. उत्तम वक्ता, सभागृहात प्रश्न मांडणारा प्रभावी नेता. माझा जवळचा मित्र म्हणून त्यांच्याकडे पाहिले आहे. मंत्रिमंडळात त्यांची खूप साथ मिळायची. सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल, हे आबांनी कायम पाहिले.विचारांशी फारकत घेतली नाही किंवा तडजोड केली नाही- पृथ्वीराज चव्हाणआर. आर. पाटील यांच्या मृत्यूने धक्का बसला. एक धाडसी आणि कामसू कार्यकर्ता म्हणून मला ते आठवतात. मी मुख्यमंत्री असताना त्यांच्याबरोबर काम करण्याचा संबंध आला. त्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात अनेक सकारात्मक बदल करायचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीत त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. वेगळ्या पद्धतीने राजकारण करण्याची त्यांची इच्छा. तळातील जनतेशी इमान राखणारा नेता आपल्यातून कमी वयात गेला याचे वाईट वाटते. राजकारणात असताना त्यांनी कधीही विचारांशी फारकत घेतली नाही किंवा तडजोड केली नाही. आमच्यात काही वैयक्तिक मतभेद असले तरी त्यामागे आर. आर. पाटील यांचा वैयक्तिक स्वार्थ कधीच नव्हता. त्यांनी कायमच जनतेच्या हिताचा पाठपुरावा केला.राष्ट्रवादीचा आधारस्तंभ हरपला- छगन भुजबळगेले काही दिवस ते कर्करोगाशी ते झुंज देत होते. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून त्यांचे पार्थिव राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या जन्मगावी तासगावला त्यांचे पार्थिव नेण्यात येईल. उद्या दुपारी १२ वाजता त्यांचे अंत्यविधी पार पडतील. आमच्या सर्वांवर दुर्देवाचा घाला पडला आहे. अतिश्य प्रामाणिकपणे काम करणारा, गरीब कुटुंबातून आलेला आणि अल्पावधीतच मोठी झेप घेतलेला नेता आम्ही गमावला आहे. आर. आर. पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा फार मोठा आधारस्तंभ होते. स्वप्नातही वाटलं नव्हतं एवढ्या लवकर असं काही घडेल.*****जिल्हा परिषदेच्या सदस्यापासून राज्याच्या गृहमंत्रीपदापर्यंतचा आर. आर. पाटील यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यांनी अत्यंत धडाडीने कामे केली. गृहमंत्रीपदी असताना त्यांनी राज्यभरात भ्रष्टाचारमुक्त पोलीस भरती केली. पोलीस दलात महिलांना मोठय़ा संख्येने समाविष्ट करणे, जनसामान्यांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वास निर्माण करणे, आदी कामे त्यांनी केली. ते माणूस म्हणूनही अत्यंत निर्मळ होते. त्यांच्या निधनामुळे अत्यंत संवेदनशील नेता हरपला आहे. - आ. अजित पवार*****आर. आर. पाटील यांच्या निधनाने ग्रामीण जीवनाशी समरस झालेल्या व्यक्तिमत्त्वास आपण मुकलो आहोत. गेली अनेक वर्षे वैयक्तिक जीवनात ते आणि मी एक जिवलग मित्र म्हणून वावरलो. ग्रामीण भागाचे प्रश्न आणि त्यासंबंधी त्यांचा पुढाकार हा नेहमी आग्रही राहिला. कामाचा मोठा व्याप असला तरी कोणालाही नाराज करायचे नाही ही भूमिका त्यांची होती. प्रभावी वक्ता म्हणून त्यांनी जनमानसात स्थान मिळविले होते. - विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे *****सत्तेच्या राजकारणात इतकी वर्षे राहून भ्रष्टाचाराचा एकही शिंतोडा न उडणे, याला आर. आर. पाटील म्हणतात. त्यांनी घेतलेले निर्णय कधी चुकले असतील, पण त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेतली नाही, हीच त्यांची महत्त्वाची व जमेची बाजू होती. राजकारणात राहून सज्जन राहणे भल्याभल्यांना जमत नाही. पण आर. आर. पाटील यांना ते जमले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. - राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना*****आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे माझा अत्यंत जवळचा मित्र काळाने हिरावला आहे. राजकारणापलिकडेही आमची मैत्री होती. आमचे कौटुंबिक संबंध होते. त्यांच्या मनात कधीही आकस नव्हता. ते गृहमंत्री असताना मी गृह खात्यावर अनेकदा कडाडून टीका केली होती. मात्र तरीही त्यांनी ती गोष्ट कधीच मनात ठेवली नाही. एवढा मनाचा उमदेपणा त्यांच्याकडे होता. एक स्पष्टवक्ता आणि स्वच्छ चारित्र्याचा नेता आपल्यातून हरपला आहे. - महसूल मंत्री एकनाथ खडसे*****आर. आर. पाटील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा, अशी त्यांची ओळख सांगता येईल. धनंजय मुंडेआर. आर. पाटील यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नाही, तर महाराष्ट्राचेही खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्याने एक तडफदार नेता, उत्तम वक्ता आणि जीवलग मित्र मी गमावला आहे. - सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी*****नम्रता आणि उत्तम वक्तृत्त्वामुळे आबा सर्वाचेच लाडके होते. राजकारणात यशोशिखरावर असतानाही ते अत्यंत विनम्र राहिले. माझा एक मित्र हरपला आहे. - खा. रामदास आठवले