Govandi honour-killing case: गोवंडी येथे झालेल्या ऑनर किलिंग प्रकरणात अटक केलेल्या चार अल्पवयीन आरोपींवर वयस्क म्हणून खटला चालविण्यास बाल न्याय मंडळाने मान्यता दिली असून या आरोपींवर आता सत्र न्यायालयात खटला चालणार आहे. बाल न्याय मंडळाने सांगितले की, हे आरोपी १६ ते १८ या वयोगटातील असून त्यांनी गुन्हा घडल्यानंतर पुरावे नष्ट करण्यास मदत केली. आपण करत असलेल्या गुन्ह्याची त्यांना पूर्ण कल्पना होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये गोवंडी येथे करण चौरसिया (२२) आणि त्याची पत्नी गुलनाझ खान (२०) यांची हत्या करण्यात आली होती. गुलनाझ खानने कुटुंबाच्या विरोधात जाऊन करण चौरसियाशी लग्न केल्यामुळे तिच्या वडिलांनी या हत्या घडवून आणल्या होत्या.

ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी नऊ आरोपींपैकी पाच अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले होते. आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून नवरा-बायकोचा ठार करण्यात आले होते. या गुन्ह्यातील चार आरोपी १६ वर्षांवरील असल्यामुळे त्यांच्यावर आता प्रौढ म्हणून खटला चालविला जाणार आहे. तर पाचवा आरोपी १६ वर्षांहून कमी वयाचा असल्यामुळे त्याला अल्पवयीन म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहे.

हे वाचा >> Bengaluru Women Murder: बंगळुरूतील ‘फ्रिज’ हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट; पीडितेच्या पतीनं प्रियकर अश्रफवर व्यक्त केला संशय

सरकारी वकील रुपल गोठवळ यांनी सांगितले की, एखाद्या घृणास्पद गुन्ह्यात आरोपी जर १६ किंवा त्यापेक्षा अधिक वयाचा असेल तर बाल न्याय मंडळ अशा आरोपीच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेची चाचणी करून तो सदर गुन्हा करण्यात किती सक्षम आहे, याचा तपास केला जातो. सदर गुन्हा करताना त्याचे परिणाम काय होणार आहेत? याची आरोपीला कल्पना होती का? याचाही तपास केला जातो. गोवंडीच्या प्रकरणात या सर्व बाबी तपासल्यानंतर बाल न्याय मंडळाने सदर आरोपींवर प्रौढ म्हणून खटला चालविण्याची परवानगी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलनाझ आणि करण यांचा ऑक्टोबर २०२३ रोजी खून करण्यात आला होता. गोवंडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत गुलनाझचे वडील गोरा खान आणि भाऊ सलमान खान यांना अटक केली. गुलनाझच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते. त्यांनी अनेकदा जोडप्याला धमकी देऊन वेगळे होण्यास सांगितले होते. जोडप्याने या धमक्यांना भीक न घालता एकत्र राहण्यावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर गुलनाझच्या कुटुंबाने वरकरणी हा निर्णय मान्य केल्याचे भासवले.

लग्नानंतर उत्तर प्रदेशहून गोवंडीत आले

गुलनाझ आणि करण दोघेही मुळचे उत्तर प्रदेशमध्ये राहणारे होते. करणचे आई-वडील नाहीत. त्याचे दोन भाऊ दिल्लीत काम करतात. गुलनाझ राहत असलेल्या गल्लीत करणची पानाची टपरी होती. दोघांचे प्रेम झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर २०२२ साली त्यांनी मध्य प्रदेशच्या एका मंदिरात लग्न केले. लग्नानंतर काही दिवस दिल्लीत राहिल्यानंतर दोघेही उत्तर प्रदेशमध्ये मूळ गावी परतले होते.

हे ही वाचा >> Akshay Shinde Encounter: ‘याने पोलिसांवर हल्ला केला?’, एन्काऊंटरच्या आधीचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

मात्र तिथे गेल्यानंतर गुलनाझच्या कुटुंबियांकडून दबाव वाढू लागला. मात्र त्याला दोघांनीही फार महत्त्व दिले नाही. त्यानंतर काही दिवसांनी गुलनाझचा भाऊ सलमानला धारावीच्या एका कापड कारखान्यात नोकरी लागली. त्यामुळे गुलनाझचे कुटुंबिय मुंबईत आले. इथे आल्यानंतर त्यांनी गुलनाझ आणि करणला संपविण्याची योजना आखली. गुलनाझशी गोड बोलून तिला माफ केले असल्याचे सांगून तुम्हाला मुंबईत स्थायिक करतो, असे सांगून बोलावून घेतले.

यानंतर गोवंडी येथे एका भाड्याने घेतलेल्या घरात त्यांची राहण्याची व्यवस्था केली. दरम्यान सलमानने त्याच्या मित्रांच्या मदतीने त्याच घरात करणचा खून केला. दरम्यान गुलनाझला तिच्या आईने धारावी येथे ठेवले होते. गोरा खान आणि सलमान खान घरी आल्यानंतर तिने करणची चौकशी केली. मात्र तो घर न आवडल्यामुळे पुन्हा उत्तर प्रदेशला गेला असल्याचे सांगितले. यावर विश्वास न बसल्यामुळे गुलनाझने वडिलांशी भांडण केले. या भांडणात वडिलांनी गुलनाझचे डोके आपटले. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला.