लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: खोट्या विम्याची कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन प्रभादेवी येथील पंजाब ॲण्ड सिंध बँकेची एक कोटी ३२ लाख रुपयांची फसणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी विमा दलाल व कर्ज घेणाऱ्या एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बँकेचे शाखा वरिष्ठ व्यवस्थापक राघव रंजन (३२) यांच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी विमा दलाल राणी दुराईराज, सोनाली बोरले व कर्जधारक वैशाली शिगवण, मनिष जैस्वाल, दीपक दाणी, रंजन प्रसाद व प्रकाश बेट यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भादंवि कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१ व ३४ अंतर्गत फसवणूक, फोजदारी विश्वासघात, बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींनी संगनमत करून शाखा व्यवस्थापकाचा विश्वास संपादन केला आणि कर्जधारकांचे बँकेत खाते उघडले. त्यानंतर बनावट व खोट्या एलआयसी विम्याची कागदपत्रे तारण ठेऊन ते खरे असल्याचे भासवले. त्या विम्याच्या माध्यमातून आरोपींनी एक कोटी ३२ लाख ३३ हजार रुपयांचे कर्ज घेतले. आरोपींनी कर्जाचा पहिला हफ्ता भरला व त्यानंतर कोणतीही रक्कम भरली नाही. त्यामुळे बँकेची फसवणूक करून नुकसान केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
हेही वाचा… अमृता फडणवीसांचा अजित पवारांना टोला, म्हणाल्या, “ते लोक खूप ठिकाणी डोळे मारतात, त्यामुळे…”
एप्रिल २०२२ ते ऑगस्ट, २०२२ या कालावधीत आरोपींनी पाच कर्ज घेतली. हफ्ता न भरल्यामुळे तारण ठेवण्यात आलेल्या विम्याची पाहणी केली असता ते खोटे असल्याचे निष्पन्न झाले. प्रभादेवी शाखेतील कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती तात्काळ वरिष्ठांना दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले. पथकाने केलेल्या चौकशीत कर्जासाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रे खोटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बँकने याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. पण गुन्ह्याची रक्कम १० कोटींपेक्षा कमी असल्यामुळे या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.