मुंबई : मढ येथील ‘सिल्वर’ समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. अनेक दिवसांपासून किनाऱ्याची सफाई झालेली नाही. त्यामुळे, येथे येणारे पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना दुर्गंधीमुळे नाक मुठीत धरावे लागत आहे.महिनाभरापासून ‘सिल्वर’ समुद्रकिनाऱ्यावर कचऱ्याचा खच पडला आहे. यात प्रामुख्याने प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या खच पडला आहे.

हेही वाचा >>> वाहतूक समस्येसाठी ‘टाटा’कडून आराखडा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची माहिती

दरम्यान, प्रशासन किनाऱ्याची नियमित सफाई करीत नसल्याचा असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला. पर्यटकांची संख्या जसजशी वाढत आहे, तसे या किनाऱ्यावर दिवसेंदिवस कचऱ्याचे साम्राज्य वाढत आहे. समुद्राला येणाऱ्या भरतीमुळे समुद्रातील कचरा किनाऱ्यावर येत आहे. मासे, तसेच पक्षी प्लास्टिकचे तुकडे अन्न समजून खातात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. तसेच समुद्रकिनाऱ्यावर नियमित साफसफाई करणे अत्यावश्यक आहे. यामुळे सागरी जीवसृष्टीचे रक्षण करण्यात आणि समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता राखण्यास मदत होईल, असे मत ‘वॉचडॉग फाउंडेशन’चे गॉडफ्रे पिमेंटा यांनी व्यक्त केले.