मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील आरोग्य व्यवस्थेत समन्वय आणून परिणामकारक करण्यासाठी आरोग्य संचालक (शहर) हे नवीन पद निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याला आता चार वर्षे उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. शहरी भागातील आरोग्य संस्थाच्या बळकटीकरणाची जबाबदारी या शहर आरोग्य संचालकांवर होती. आरोग्य विभागात आरोग्य संचालकांची तीन पदे असून संचालकांचे केवळ एकच पद भरण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी आरोग्य सचिव एक, आरोग्य सचिव दोन व आयुक्तांसह आरोग्य विभागात आयएएस अधिकार्यांची तसेच अर्धा डझन सहसचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आरोग्य विभागात एवढे आयएएस अधिकारी आणल्यामुळे आरोग्य विभागात नेमक्या किती सुधारणा झाल्या असा सवालही आरोग्य संचलानलयातील डॉक्टरांकडून उपस्थित करण्यात येत आहे. आज आरोग्य विभागाला पुरेसा निधी मिळत नाही,तर मिळालेला निधी वेळेत खर्च होऊ शकत नाही. आरोग्य विभागात डॉक्टरांसह हजारो पदे रिक्त आहेत तसेच कालबद्ध पदोन्नतीही मिळत नाही याची जबाबदारी कोणाची असा सवालही डॉक्टरांकडून उपस्थित करण्यात येत नाही. आरोग्य विभागाच्या रुग्णालयात औषधे मिळत नाहीत तसेच औषधांच्या दर्जाबाबात विधिमंडळात अनेकदा आमदार आवाज उठवतात. याची जबाबदारी कोण घेणार हा कळीचा प्रश्न आहे. एकमेव पूर्णवेळ आरोग्य संचालक असलेल्या डॉ नितीन अंबाडेकर यांना शिपायवरही कारवाई करायचा अधिकार नसेल तर डॉक्टरांमध्ये कामाबाबत आत्मविश्वास कसा निर्माण होणार असा सवालही डॉक्टरांकडून उपस्थित करण्यात येताना दिसतो. खरोखरच एवढ्या सनदी अधिकार्यांची आरोग्य विभागाला आवश्यकता आहे का,याचा आढावा आरोग्यमंत्र्यांनी व सरकारने घ्यावा असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राज्यात करोना काळात मुंबईसह महापालिका क्षेत्रात तसेच शहरी भागात आरोग्य व्यवस्थेतील समन्वयापासून निर्माण झालेल्या अनेक मुद्द्यांचा विचार करून आरोग्य संचालक शहर व त्यासोबतच अन्य सहा पदे आरोग्य विभागाने निर्माण केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तबही करण्यात आला होता. शहरी भागासाठी संचालक, आरोग्य सेवा (शहरी), उप संचालक-२ पदे, सहायक संचालक-४ पदे अशी ही नवी यंत्रणा मंजूर करण्यात आली होती. शहरी भागांमध्ये प्राथमिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी संचालक शहरी आरोग्य सेवा यांची असेल असे स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेसोबतच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची नियमतीपणे देखभाल, परिक्षण व नियंत्रण करतानाच त्याचा आढावाही संचालक शहरी आरोग्य यांच्यावर घेण्याची जबाबदारी होती.

महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरोग्य व्यवस्थेत तज्ज्ञांची तसेच योग्य धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या संचालकांच्या अखत्यारित ही यंत्रणा काम करणे अपेक्षित होते. आरोग्य आयुक्त शहर हे पद योग्य वेळेत तयार होऊन कार्यन्वित झाले असते व त्यांनी राज्यातील छोट्या महापालिका, नगरपालिका वा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन राज्याच्या नगरविकास सचिवांच्या निदर्शनास ही बाब आणली असती. यातून महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य संस्थांमध्ये काही सुधारणा झाल्या असत्या तर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यू काही प्रमाणात टाळता आले असते असेही आरोग्य विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. गंभीरबाब म्हणजे राज्याच्या आरोग्य विभागाचा कारभार ज्या आरोग्य संचलनालयातून चालतो त्या आरोग्य संचलनाल यात आरोग्य संचालक शहर तसेच अन्य एका संचालकांचे पदे चार वर्षांनंतरही रिक्त आहे. आत्ता एक महिन्यापूर्वी कुणाला तरी जाग आली आणि आरोग्य संचालक (शहर)पदी हंगामी म्हणून डॉ स्वप्निल. लाळे यांची नियुक्ती करण्यात आली. याचा दुसरा अर्थ असा की एवढ्या वर्षातील सचिवांनी या पदासाठी कायमस्वरुपी संचालकच शोधला नाही.

ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नागरी कार्यक्षेत्रात आरोग्य सेवेचे काम कमी आहे, तेथे नगरविकास विभागाच्या सचिवांना निदर्शनास आणून देणे व कायर्क्षमता वाढीसाठी उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी ‘आरोग्य संचालक यांची होती. तसेच साथरोग नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे आणि आरोग्य सेवा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरविकास विभाग यांच्यात समन्वयाची जबाबदारी देखील या आरोग्य संचालकांवर सोपविण्यात आली होती. ‘आरोग्य संचालक संचालक शहर’ यांच्या सोबत उपसंचालक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, उपसंचालक संसर्गजन्य रोग नियंत्रण तसेच कुटुंब कल्याण, इतर आरोग्य कार्यक्रम, जलजन्य, किटकजन्य आजार आणि इतर सांसर्गिक, असांसर्गिक आजार या विभागांसाठी चार सहायक संचालक देण्याचेही धोरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आले होते. राज्यातील शहरी भागामध्ये लसीकरण, साथ रोग व इतर आरोग्यविषयक कार्यक्रम अधिक परिणामकारकतेने राबविण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत राहील, असे याबाबतचे धोरण होते. ऑगस्ट २०२० मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘आरोग्य संचालक शहर’ या पदावर शिक्कामोर्तब करण्यात आला खरा मात्र चार वर्षे उलटूनही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. आरोग्य विभागाला पुरेसा निधी एकीकडे द्यायचा नाही तर दुसरीकडे संचालकांसह डॉक्टरांची शेकडो रिक्त पदे भरायची नाहीत ही गंभीर बाब आहे. आरोग्य विभागात येणारे सचिव वा आयुक्त तीन वर्षांसाठी येतात. यातील काहींना आरोग्य विभागात काम करायचीही इच्छा नसते परिणामी आरोग्य विभाग आज खिळखिळा झाला आहे तर आरोग्य संचालकांपासून सिव्हिल सर्जनपर्यंत सर्व डॉक्टर मंडळी हाती अधिकार नसल्याने दुबळे झाले आहेत असे आरोग्य विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Story img Loader