मुंबईला मायानगरी असं म्हटलं जातं. मुंबईत अनेकजण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. आजही मुंबईचं आकर्षण नाही असे लोक विरळाच. याच मुंबई संदर्भात एक चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत रोज हार्ट अटॅकमुळे २६ जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती आहे. तर कर्करोगाने रोज मुंबईत २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. माहितीच्या अधिकारात २०२२ ची ही माहिती उघड झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुठल्या विकारामुळे किती मृत्यू २०२२ मध्ये झाले? यासंदर्भातली माहिती RTI म्हणजेच माहितीच्या अधिकारात मागवण्यात आली होती. त्यामध्ये कोव्हिडमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी होताना दिसलं. मात्र हार्ट अटॅकमुळे रोज २६ मुंबईकरांना जीव गमवावा लागला आहे अशी माहिती समोर आली. कोव्हिडमुळे २०२० या वर्षात मुंबईत १० हजार २८९ मृत्यू झाले. २०२१ मध्ये ११ हजार १०५ मृत्यू झाले तर २०२२ मध्ये हे प्रमाण १८९१ मृत्यू इतकं कमी झालं होतं.

२०२२ या वर्षात टीबीमुळेही अनेक मृत्यू

हार्ट अटॅकप्रमाणेच टीबी म्हणजेच क्षय रोगामुळेही मुंबईत बहुतांश मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे. २०२२ मध्ये क्षयरोगाची बाधा झालेल्या ३ हजार २८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २०१८ मध्ये ही संख्या ४ हजार ९४० इतकी होती.

मुंबईकर चेतन कोठारी यांनी कुठल्या रोगांमुळे मुंबई किती मृत्यू झाले याविषयीचा आरटीआय दाखल केला होता. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती मागवण्यात आली होती. त्यामध्ये २०२२ या वर्षात हार्ट अटॅकमुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

हृदयविकार आणि त्यामुळे होणारे मृत्यू हा मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे असं के.ई.एम रुग्णालयाचे डॉ. प्रफुल्ल केरकर यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर कमी वयात हृदयविकाराचा झटका येणं ही देखील चिंतेची बाब आहे. जागतिक स्तरावर जर विचार केला तर हार्ट अटॅकमुळे होणारे मृत्यू वाढले आहेत. तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. चालणं कमी, सकस आहार न घेणं, वाट्टेल त्या वेळी जेवण मागवणं, घरातून बाहेर पडलं की एसी वाहनांनी प्रवास करणं अशी अनेक कारणं आणि बदलेली जीवनशैली या सगळ्याला कारणीभूत आहे असंही त्यांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heart attack 26 lives in a day in mumbai and cancer took 25 lives in a day in 2022 rti report scj