मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. पहाटेपासून अनेक भागात संततधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

शहर आणि उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून संततधार पाऊस कोसळत आहे‌. शहरातील परळ, कुलाबा, वरळी भागात पावसाचा जोर वाढला आहे. उपनगरातील वांद्रे, अंधेरी परिसरात देखील पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढील दोन – तीन दिवस पाऊस सक्रिय राहील असा अंदजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने शहर आणि उपनगरांत बुधवारी दमदार हजेरी लावून हाहाकार उडवला. बुधवारी संध्याकाळी सुरू झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. रुळांवर पाणी साचल्याने लोकलची एका मागोमाग एक रांग लागली होती. काही प्रवासी लोकलमध्ये, तर काही रेल्वे स्थानकांवर अडकले होते.

हेही वाचा – मुंबई : पाणी साचण्याची कारणे शोधण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय

पहाटेपासून पाऊस सक्रिय

पावसाळी वातावरण, ढगाळ हवामानामुळे मुंबईतील उकाडा काहीसा कमी झाला आहे. दरम्यान, विजांचा कडकडाट हे परतीच्या पावसाचे लक्षण असले तरी परतीचा पाऊस सर्वदूर पडत नाही. तसेच राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सध्या पडणारा पाऊस परतीचा नाही. मात्र, ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे सुनील कांबळी यांनी सांगितले.

हेही वाचा – मतमोजणीची उत्सुकता शिगेला, मुंबई विद्यापीठ अधिसभेवर वर्चस्व कोणाचे?

दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांतून मंगळवारी मोसमी वारे परतले आहेत. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून उत्तर बांगलादेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. याचबरोबर शुक्रवारनंतर ठाणे, पालघरमधील पावसाचा जोर कमी होईल. तसेच शनिवारी राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे.