वांद्रे स्थानकावर मंगळवारी दुपारी गाडी बराच वेळ रेंगाळली आणि प्रवाशांच्या मनात भीतीची पाल चुकचुकली. पुढच्या संकटाची अस्वस्थ जाणीव प्रवाशांच्या चेहऱ्यावर उमटली. साऱ्या नजरा खिडकीतून दिसणाऱ्या आभाळाच्या तुकडय़ाकडे लागल्या. संकट गडद होत आहे, हे गाडीच्या गतीवरूनच समजत होते. कसेबसे माहीम स्थानक गाठले आणि गाडी जागेवरच थांबली. मग ‘२६ जुलै’चे अनुभवकथन सुरू झाले, आणि भेदरलेल्या काहींनी गाडीतून उतरून परतीच्या गाडीचे दुसरे फलाट गाठले. उरल्यासुरल्या भयभीत प्रवाशांना घेऊन गाडी दादरच्या दिशेने सरकली. माटुंगा स्थानकावरच पुढच्या संकटाचा अंदाज आला होता. क्षणाक्षणाला रुळांवरील पाण्याची पातळी उंचावत होती. तरीही गाडी सरकत होती. दादर, एल्फिन्स्टन रोड, लोअर परळ पार पडले आणि महालक्ष्मीनंतर पुन्हा गाडी कमालीची मंदावली. चर्नी रोड आणि मरीन ड्राइव्हच्या मध्ये गाडीने धीर सोडला. तब्बल तासभर एकाच जागी अनेक गाडय़ा उभ्या होत्या. पुढे आणि मागेही गाडय़ांची रांग होती. चर्चगेटचे फलाट मोकळे मिळेपर्यंत गाडी जागेवरून हलणार नाही, आणि उत्तर मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ा सुटतच नव्हत्या. त्यामुळे चर्चगेटचे फलाट रिकामे होण्याची आशा मावळलेल्या अनेकांनी अखेर गाडीतून उडय़ा मारल्या आणि पायपीट सुरू केली.. तब्बल तासानंतर गाडी हलली आणि चर्चगेट स्थानकावर धापा टाकत विसावली. बोरीवली ते चर्चगेट ‘डबल फास्ट’ने तब्बल अडीच तासांनंतर पल्ला गाठला. विलंबाचा नवा इतिहास कालच्या पावसाने घडविला..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा