लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई तसेच उपनगरांत मंगळवारपासून पावसाची रिपरिप सुरू झाली असून बुधवारी पहाटेपासून अनेक भागात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. दरम्यान, पुढील काही तासांत मुंबईत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागान वर्तविली आहे.

मुंबईसह उपनगरांत मंगळवारपासून पावसाने हजेरी लावली आहे‌. यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मोसमी पाऊस यंदा लवकर दाखल झाला असला तरी पावसात खंड पडल्यामुळे उकाडा सहन करावा लागत आहे. मुंबई तसेच उपनगरांत मंगळवारी रात्री पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी पहाटेपासून दादर,भायखळा,परेल, प्रभादेवी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच उपनगरांतील गोरेगाव,अंधेरी, विलेपार्ले, वांद्रे, सांताक्रूझ परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळत आहेत. पुढील काही तासांत मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवार सकाळी ८:३० ते बुधवारी सकाळी ८:३० दरम्यान हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ५५.२ मिलिमीटर तर सांताक्रूझ केंद्रात २०.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

आणखी वाचा-सात सराफांचे पावणेचार कोटींचे दागिने घेऊन कारागिर पसार

मोसमी पाऊस दाखल झालेल्या भागात अजूनही पावसाने तितकासा जोर धरलेला नाही. पावसात खंड पडला की उन्हाचा चटका आणि उकाडा सहन करावा लागत आहे. दरम्यान, आज मुंबईसह ठाणे,रायगड, रत्नागिरी भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मोसमी वाऱ्यांनी बहुतांश भागात प्रगती केली आहे.मंगळवारी विदर्भातील चंद्रपूर आणि अमरावती भागात मोसमी वाऱ्यांनी मजल मारली. त्यानंतर मात्र मोसमी वाऱ्यांची प्रगती झालेली नाही.