मुसळधार पावसाच्या दणक्याने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच रेल्वे, रस्ते वाहतुकीचे वेळापत्रक पार विस्कटून गेले. उपनगरांतून मुंबईकडे येणारे रस्ते तसेच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीत सापडलेल्या वाहनांच्या दोन-तीन किलोमीटरच्या रांगांनी झाकून गेले. रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने हार्बर रेल्वे काही काळ बंद पडली तर मध्य रेल्वेवर गाडय़ा पाऊण तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे मध्य व हार्बर रेल्वेच्या ६० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. सकाळच्या या मुसळधारवृष्टीने हा दिवस यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाचा दिवस ठरला, शिवाय गेल्या दहा वर्षांतील जुलै महिन्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंदही बुधवारी सकाळी झाली. या मोसमातील सर्वात मोठी भरती दुपारी असल्याने मुंबई पाण्याखाली जाणार अशी भीती वाटत असताना पावसाने त्यापूर्वीच आवरते घेत मुंबईकरांची सुटका केली. बुधवारची सकाळच मुसळधार पावसाच्या संगतीने उजाडल्याने मुंबई पुन्हा पाण्याखाली गेल्याचे चित्र होते. ठिकठिकाणी पाणी साचल्याने आणि पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे नसल्याने ‘गरज असेल तरच बाहेर पडा’ अशी सूचना नागरिकांना देण्यात आली. परिणामी अनेक शाळांना सुटी देण्यात आली तर चाकरमान्यांनी थेट रजा टाकत पावसासमोर शरणागती पत्करली. धावत्या मुंबईचा वेग सकाळीच रोखला गेला. त्यामुळे दक्षिण मुंबईतील गजबजलेले रस्ते, लोकलगाडय़ा रिकाम्या दिसत होत्या. गर्दीने ओसंडून वाहणारी मुंबई आणि रेल्वेस्थानके शांत-शांत दिसत होती. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास पावसाचा जोर ओसरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा