मुंबई: मुंबईतील अंधेरी भागात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे.रुग्णवाढीच्या यादीमध्ये अंधेरी आघाडीवर असून त्याखालोखाल चेंबूर, कुलाबा, वांद्रे भागामध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी २८४ दिवसांपेक्षाही कमी झाला आहे. मुंबईमध्ये गेल्या आठवडाभरात अंधेरी पश्चिम भागात १ हजार ४४१ रुग्ण, अंधेरी पूर्व भागात ९१५ रुग्ण आढळले आहेत. शहरातील २४ विभागांमधील सहा भाग वगळता अन्य भागांमध्ये दर आठवड्याला नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या पाचशेच्याही वर गेली आहे. शहरात अंधेरीपाठोपाठ वांद्रे परिसरात करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ कायम आहे. वांद्रे परिसरात आठवडाभरात ९४५ रुग्ण नव्याने आढळले आहेत. चेंबूर पश्चिम भागातील प्रादुर्भाव वेगाने वाढत असून दैनंदिन रुग्णसंख्या मागील काही दिवसांमध्ये १०० च्या वर गेली आहे.

 मुंबईत १३ हजार ६१३ रुग्ण उपचाराधीन असून सर्वाधिक सुमारे १७ टक्के रुग्ण अंधेरीमध्ये आहेत. अंधेरी पश्चिम भागात १ हजार ४५३ तर पूर्व भागात ९२२ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्या खालोखाल वांद्रे, ग्रॅन्ट रोड आणि भांडुप या भागांमध्ये जास्त रुग्ण उपचाराधीन आहेत. बहुतांश रुग्ण हे गृहनिर्माण संकुलांत आढळत असून तुलनेत झोपडपट्टीमध्ये रुग्णसंख्या कमी आहे. त्यातही ९५ टक्क्यांहून अधिक रुग्ण गृहविलगीकरणातच बरे होत असल्याने संपर्कातील व्यक्तींना दाखल करण्यासाठी सुरु केलेल्या करोना काळजी केंद्र १ मध्ये शून्य रुग्णांची नोंद झाली आहे, असे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.रुग्णवाढ वेगाने होणाऱ्या विभागांवर विशेष लक्ष देण्याचे सूचित केले आहे. तसेच चाचण्या वाढविण्याचेही आदेश दिले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. चाचण्या मात्र अजून कमीच शहरातील दैनंदिन चाचण्यांच्या संख्येत चढ-उतार सुरू असून सरासरी १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले असले तरी एखादा दिवस वगळता चाचण्यांनी १५ हजारांचा टप्पा पार केलेला नाही.