मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेले नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी कोल्हापूर येथील सत्र न्यायालयाला दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांची बाजू न ऐकताच कोरटकर यांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्याचा आदेश योग्य नाही, असेही न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठाने उपरोक्त आदेश देताना स्पष्ट केले. या प्रकरणी लवकरात लवकर नव्याने सुनावणी घेण्याचेही एकलपीठाने स्पष्ट केले. त्यानुसार, मंगळवारी दुपारीच कोल्हापूर येथील सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

कोरटकर यांना मंजूर केलेला अटकपूर्व जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कोरटकर तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा सरकारने ही मागणी करताना केला होता. राज्य सरकार आणि पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दुसरीकडे, कोरटकर पोलिसांना तपासात सहकार्य करत नाहीत आणि तपास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे टाळत आहेत. त्यामुळे, तपासात अडथळे निर्माण होत असल्याचे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी उच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळी न्यायालयाला सांगितले. .

कोल्हापूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी कोरटकर यांना अटकेपासून दिलासा देताना काही अटी घातल्या होत्या. त्यानुसार, कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात बोलावले जाईल तेव्हा उपस्थित राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच, अटकेपासून दिलासा मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत नागपूर येथील सायबर विभागाकडे भ्रमणध्वनी स्वाधीन करण्याची अटही न्यायालयाने घातली होती. तथापि, कोरटकर यांच्याकडून या दोन्ही अटींची पूर्तता करण्यात आलेली नाही. याउलट, त्यांनी पत्नीच्या माध्यमातून त्यांचा भ्रमणध्वनी पोलिसांकडे स्वाधीन केला होता. त्यामुळे, सत्र न्यायालयाने कोरटकर यांना दिलेला दिलासा रद्द करावा, अशी मागणी सरकारतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली.

.दरम्यान, कोरटकर यांनी केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आणि समाजाविरुद्ध आहे. आरोपीने छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध आक्षेपार्ह विधाने केली आहेत व जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच, सत्र न्यायालयाने कोरटकर यांना दिलेला दिलासा रद्द केला नाही तर त्याचा खटल्यावर गंभीर परिणाम होईल, असा दावाही सरकारने याचिकेत केला होता.

प्रकरण काय ?

सावंत यांनी छावा चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. ही भूमिका मांडत असताना त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करून कोरटकर यांनी फोन करून थेट धमकी दिली, असा दावा सावंत यांनी केला आहे. याबाबत सावंत यांनी एक कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर प्रसिद्ध केली. त्यात, जिथे असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असे म्हणत कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची धमकी दिली आहे. यानंतर कोरटकर यांच्याविरूद्ध कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे, अटक टाळण्यासाठी कोरटकर यांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती.