कल्याण डोंबिवलीचा समतोल विकास होण्यासाठी स्थायी समिती सदस्यांनी सुचविलेल्या सूचना, आर्थिक तरतुदी यांचा विचार न करताच शिवसेनेचे स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांनी स्थायी समिती सदस्यांच्या अपरोक्ष या नोंदी, तरतुदींमध्ये बदल करून करदात्या नागरिकांचा विचार न करता ठेकेदार, दलाल यांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केल्याचा आरोप सोमवारी सर्वसाधारण सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला.
सभापतींच्या मनमानीचा निषेध करण्यासाठी पालिकेच्या प्रवेशद्वारावर अर्थसंकल्पाची होळी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी केली. पालिकेचा आगामी वर्षांचा १४९५ कोटींचा अर्थसंकल्प सभापती शेट्टी यांनी प्रशासनाला सादर केला. या वेळी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी शेट्टी यांच्या भाषणात सतत अडथळे आणून गोंधळ घातला. सात दिवसांची मुदत न देता सभेचा अजेंडा सदस्यांना पाठविण्यात आला आहे. केवळ ठेकेदार, दलाल आणि काही ठरावीक नगरसेवकांच्या प्रभागात मोठय़ा आर्थिक तरतुदी असलेली विकासकामे सभापतींनी मंजूर केली आहेत. करदात्या नागरिकांची ही फसवणूक व विश्वासघात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका माधुरी काळे यांनी केला. याबाबत काँग्रेसचे रवी पाटील व इतरांनी महापौर, आयुक्तांना पत्रे दिली आहेत.