राष्ट्रवादी ‘प्रचंड आशावादी’ अशी जाहिरात करणाऱ्या राष्ट्रवादीला नवी मुंबईच्या विजयाने संजीवनी प्राप्त झाली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचलेल्या राष्ट्रवादीला या विजयाने बळ मिळाले असून, मे महिन्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य नेते राज्यभर दौरे करून पक्ष वाढविण्यावर भर देणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची पीछेहाट झाली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी चौथ्या क्रमाकांवर फेकला गेला. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीची भाजपशी जवळीक वाढल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. अलिबाग आणि पुण्यात शिबिरे घेऊन नेते आणि पदाधिकाऱ्यांचे मनोधैर्य उंचावेल, अशी खबरदारी घेतली. नवी मुंबईत गणेश नाईक यांच्यामुळे राष्ट्रवादीला विजय मिळाला असला तरी हा विजय राष्ट्रवादीकरिता फायदेशीर ठरणार आहे. या विजयाने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.
पक्ष संघटना वाढीला राष्ट्रवादीने आता प्राधान्य दिले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार २ मेपासून दौरा सुरू करणार आहेत. सुरुवातीला मराठवाडय़ाच्या दुष्काळी भागांचा दौरा करणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्याच्या अन्य भागांमध्ये दौरा करणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आदी नेतेही राज्याच्या विविध भागांमध्ये दौरा करणार आहेत. काँग्रेस कमकुवत झाल्याचा फायदा उठविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hope rises with navi mumbai victory for ncp