फेब्रुवारी २०२३ मध्ये मुंबईच्या आयआयटीमध्ये दर्शन सोलंकी नावाच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यानं आपल्या हॉस्टेलच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दर्शनला जातीभेदाचा सामना करावा लागल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईतील परिस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे आता आयआयटी मुंबई व्यवस्थापनाने कोणत्याही परिस्थितीत जातीभेदाला खतपाणी मिळू नये, यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना त्यांचे JEE Advanced किंवा GATE चे गुण विचारू नयेत, अशी सूचना करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे परिपत्रकात?

IIT मुंबईनं विद्यार्थ्यांना या मार्गदर्शक सूचना देण्यासाठी जाहीर परिपत्रक काढलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी संस्थेच्या परिसरात कोणत्या गोष्टींचं पालन करायला हवं, याबाबतच्या नियमावलीचा समावेश करण्यात आला आहे. “विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना त्यांचे JEE Advanced किंवा GATE च्या परीक्षांचे गुण विचारू नयेत. अशा प्राकरची विचारणा ही त्यांची जात जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणून पाहिली जाऊ शकते. यातून जातीभेदाला खतपाणी मिळू शकतं”, असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

हे परिपत्रक आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलं आहे. विशेषत: हॉस्टेल परिसरात हे परिपत्रक पाहायला मिळत आहे. “अशा प्रकारे इतरांना गुण विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यात काहीही चुकीचं वाटत नसावं. उत्सुकतेपोटी हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण असे प्रश्न बऱ्याचदा इतर विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम करणारे ठरतात. जात, धर्म किंवा इतर कोणत्याही सामाजिक-आर्थिक घटकांशिवाय विद्यार्थ्यांमध्ये सहसंबंध निर्माण व्हायला हवेत”, असंही या पत्रकात नमूद केलं आहे.

आयआयटीतील दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरण; चिठ्ठीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांला अटक

“विनोद फॉरवर्ड करू नका!”

दरम्यान, जातीवर टिप्पणी करणारे विनोद फॉरवर्ड न करण्याचेही निर्देश विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. “अपमान करणारे, द्वेष पसरवणारे, जातीभेद पसरवणारे, लिंगभेदावर आधारीत अवमानकारक विनोद विद्यार्थ्यांनी फॉरवर्ड करु नयेत. असे विनोद मानसिक त्रास देण्याचं साधन म्हणून पाहिले जाऊ शकतात. जे याचं उल्लंघन करतील, त्यांना कठोर शिक्षा होऊ शकते”, असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं फेब्रुवारी महिन्यात?

१२ फेब्रुवारी रोजी आयआयटी मुंबईत पहिल्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या दर्शन सोलंकीचा हॉस्टेलच्या आठव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. दर्शननं आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या तपासात दर्शन सोलंकीच्या हस्ताक्षरात लिहिलेली सुसाईड नोट सापडली. यात अरमान खत्री नावाच्या १९ वर्षीय मुलाचं नाव लिहिण्यात आलं होतं. मृत्यूआधी दर्शन सोलंकी व अरमान खत्री यांच्यात जाती-धर्मावर आधारित टिप्पणी करण्यावरून वाद झाल्याची बाब पोलीस तपासात समोर आली. खत्रीनं दर्शन सोलंकीला कटर दाखवून धमकावल्याचंही उघड झालं. १० फेब्रुवारीला दर्शननं खत्रीला मेसेज पाठवून माफी मागितली. मात्र खत्रीनं त्याच्या मेसेजेसचा रिप्लाय दिला नाही. ११ फेब्रुवारीला दर्शनला तापही आला होता. १२ फेब्रुवारीला दर्शनचा हॉस्टेलच्या आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iit mumbai anti discrimination guidelines dont ask jee advanced gate score pmw