मुंबई : अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतूवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या दोन घटना अवघ्या तीन दिवसात घडल्या असून त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (‘एमएमआरडीए’) चिंतीत झाले आहे. परिणामी, अटल सेतूच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला असून याबाबत उपाययोजना करण्यासाठी आयआयटीच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. लवकरच आयआयटीतील तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती अभ्यास करून आत्महत्येच्या घटना रोखण्यासह अटल सेतू प्रवासाच्यादृष्टीने आणखी सुरक्षित करण्यासाठी आवश्यक त्या शिफारशी आपल्या अहवालात सुचविणार आहे.

मुंबई – नवी मुंबई प्रवास अतिवेगवान करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने अटल सेतूची उभारणी केली. अटल सेतू फेब्रुवारीपासून वाहतूक सेवेत दाखल झाला. अटल सेतू सर्वदृष्टीने सुरक्षित असल्याचा दावा सुरुवातीपासून ‘एमएमआरडीए’कडून केला जात आहे. अटल सेतूवर अत्याधुनिक अशी वाहतूक नियंत्रण प्रणाली कार्यान्वित आहे. रस्त्यात कुठेही गाडी थांबविणाऱ्यांविरोधात, अतिवेगात गाडी चालविणाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करणे या प्रणालीद्वारे शक्य होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असे असताना मागील तीन दिवसात अटल सेतूवरून उडी मारून दोघांनी आत्महत्या केल्या आहेत. मुंबईतील एका नामांकित बँकेतील उपव्यवस्थापक सुशांत चक्रवर्ती यांनी ३० सप्टेंबर रोजी, तर २ ऑक्टोबर रोजी एका व्यावसायिकाने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनांमुळे अटल सेतूवरील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, अटल सेतू वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून आतापर्यंत आत्महत्येच्या एकूण पाच घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे ‘एमएमआरडीए’ची चिंता वाढली आहे.

हेही वाचा >>>पहिल्या टप्प्यातील १,२६० घरांच्या बांधकामाला वेग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास प्रकल्प

अटल सेतूवर घडलेल्या या घटनांची अखेर एमएमआरडीएने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळेच आता अशा घटना रोखण्यासाठी आयआयटीच्या तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी दिली. आत्महत्यासारख्या घटना रोखण्यासाठी अटल सेतूच्या दोन्ही बाजूला जाळ्या बसविण्याची सूचना वाहतूक पोलिसांकडून आली आहे. मात्र वार्याचा वेग पाहता, या परिसरात पक्ष्यांचा वावर पाहता जाळ्या बसविणे व्यवहार्य ठरणार नाही. अशावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या घटना रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी आयआयटीच्या तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही मुखर्जी यांनी सांगितले. लवकरच या समितीची स्थापना होणार असून या समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार पुढे आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे. तर अटल सेतू अधिकाधिक सुरक्षित करण्याच्यादृष्टीने एमएमआरडीएकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, यापुढेही केल्या जातील असेही एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.